पर्यावरण दिनानिमित्त येत्या रविवारी (२ जून) येथील यशवंत महाराज पटांगणात सायंकाळी साडेसहा ते साडेआठ या वेळेत गोदावरी प्रदूषणाविरोधात जनजागृतीसाठी गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
उच्च न्यायालयाने गोदावरी नदीचे पाणी मानवी वापरासाठी अयोग्य व शरीरास धोकादायक असल्याच्या आशयाचे फलक नदीकिनारी लावण्यात यावेत असे आदेश दिलेले आहेत. न्यायालयाने जनतेकडून होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी ३० पोलीस कर्मचारी व चार निरीक्षकदेखील नियुक्त करण्याचे आदेश दिलेले आहेत. प्रशासकीय प्रदूषणाची म्हणजेच गटारीतून येणारे सांडपाणी, औद्योगिक रसायन यासंबंधी उपाययोजना करण्यासाठी तज्ज्ञ म्हणून ‘राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था’ या संस्थेची न्यायालयाने नेमणूकही केली आहे. या विषयावर न्यायालयाने महानगर पालिकेला मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करण्याचे आदेश दिले होते.
पर्यावरण दिनानिमित्ताने गोदावरी गटारीकरण विरोधी मंचच्या वतीने होणाऱ्या जनजागृती कार्यक्रमांना नाशिककरांनी उपस्थित राहावे असे आवाहन मंचच्या वतीने राजेश पंडित, निशिकांत पगारे, जगविरसिंग, दीपक डोळस, नितिन रुईकर, संजय निकम आदींनी केले आहे.