राजस्थान आणि हरियाना भागातून वाहणारी सरसी किंवा सिरसा हीच मूळची सरस्वती नदी असली पाहिजे. या नदीचे ऐतिहासिक अवशेष हेच पुरावे म्हणून ग्राह्य़ धरले पाहिजेत, असे मत ब्रिटिश कोलंबिया विद्यापीठाचे सुप्रतिष्ठ प्राध्यापक डॉ. अशोक अकलूजकर यांनी गुरुवारी व्यक्त केले.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेतर्फे ‘ऋग्वेदातील सरस्वती नदी : आजवरचा दिशाहीन शोध’ या विषयावर डॉ. अशोक अकलूजकर यांनी प्रा. टी. जी. माईणकर स्मृती व्याख्यान पुष्प गुंफले. संस्थेचे मानद सचिव अरुण बर्वे याप्रसंगी उपस्थित होते.
डॉ. अशोक अकलूजकर म्हणाले, राजस्थान-हरियाना भागातून वाहणारी घग्गर नदी हीच मूळची सरस्वती अशी यापूर्वीची समजूत होती. या नदीला अनेक प्रवाह असणारी नदी आणि त्याचप्रमाणे विविध उपनद्या होत्या. ऋग्वेदामध्ये ७५ ठिकाणी सरस्वती नदीचा संदर्भ आहे. तसेच महाभारतामध्ये आलेला संदर्भदेखील या मताशी सहमत होईल असा आहे. मात्र, ज्या नदीला सरसी किंवा सिरसा असे संबोधिले जाते तीच मूळची सरस्वती नदी असली पाहिजे. कोकणातील नदीला आपण राजापूरची गंगा म्हणतो. यामुळे गंगेचा उगम कोकणात झाला असे म्हणता येणार नाही. पवित्र नावापेक्षाही नदीचे ऐतिहासिक अवशेष हेच पुरावे म्हणून ग्राह्य़ धरले पाहिजेत.