शेतकरी सहकारी संघाने गेल्या तीन वर्षांपासून नफ्याची परंपरा अखंडित राखत सभासदांना ९ टक्के लाभांश जाहीर केला, तसेच संघाच्या विकासासाठी तरुण सदस्यांनी पुढे यावे, अशी हाक ७२व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संचालक मंडळाने दिली. अध्यक्षस्थानी वसंतराव मोहिते होते. शाहू मार्केट यार्ड येथील संघाच्या सेल हॉलमध्ये सभा झाली.
संघाचे कार्यकारी संचालक अजितसिंह मोहिते यांनी अहवाल वाचन केले. संघाचे शेअर भांडवल ९४ लाख ३२ हजार ३०० असून खेळते भांडवल २२ कोटी ३७ लाख २ हजार ७६८ इतके असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर विषयपत्रिकेवरील १ ते ७ ठराव एकमताने सभासदांनी टाळय़ांच्या गजरात मंजूर केले. आयत्या वेळी विजय सरनोबत, बाळासाहेब पोवार, वसंत भोसले (म्हसवे), विलास कदळे आदी सभासदांनी विविध विषय मांडले. त्यामध्ये ऊसदरावर लवकर तोडगा काढा, संचालक मंडळाचा अभिनंदनाचा ठराव, वडणगे-रत्नागिरी मार्गावर वाहनांसाठी गॅसपंप सुरू करणे, संघास संचालक गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्यावे, खत कारखाना पुन्हा सुरू करावा आदी विषय होते.
शेतकरी संघाला गेल्या तीन वर्षांपासून नफा होत असून, गेल्या वर्षीच्या तुलनेत सहा लाखांच्या घरात म्हणजेच १७ लाख ४८ हजार ३५१ इतका नफा झाला. त्यामुळे सभासदांना या वर्षी ९ टक्के लाभांश जाहीर करत असल्याची घोषणा अध्यक्ष वसंतराव मोहिते यांनी जाहीर केले. उपस्थित सभासदांनी त्याचे टाळय़ांच्या गजरात स्वागत केले. संघाने सन २०११-१२मध्ये १११ कोटी ६७ लाख ९९ हजार २६९ इतकी उलाढाल केली. त्यामध्ये संघास ६ कोटी ३ लाख ९७ हजार ५८१ इतके उत्पन्न मिळाले. त्यामधून ५ कोटी ८६ लाख ४९ हजार २३० इतका खर्च झाला. त्यामुळे संघास एकूण १७ लाख ४८ हजार ३५१ इतका निव्वळ नफा झाला. आर्थिक वाटचाल करीत असताना संघ पूर्णपणे कर्जमुक्त झाला असल्याचेही मोहिते यांनी या वेळी सांगितले.
संघाचे उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील-भुयेकर यांनी पूर्वी झालेल्या चुकीची दुरुस्ती करून संघाला पूर्वीचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी तरुण सभासदांनी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी करून आभार मानले.
सभेस अॅड. श्यामराव िशदे, अण्णासाहेब चौगुले, मानसिंगराव जाधव, यशवंतराव पाटील-टाकवडेकर, शोभना िशदे-नेसरीकर, विजयादेवी राणे, अशोकराव देसाई, दिलीपसिंह पाटील, मानसिंग पाटील, बाळकृष्ण भोपळे, व्यंकाप्पा भोसले, प्रकाश पाटील उपस्थित होते.