क्रीडा प्रकारात क्रिकेटला ग्लॅमर प्राप्त झाले, तसेच शेतीलाही प्राप्त होण्याची गरज आहे. त्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्वतोपरी प्रयत्न करेल, असे प्रतिपादन आमदार प्रवीण दरेकर यांनी केले.
मनसेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मनसेचे सरचिटणीस अविनाश अभ्यंकर होते. जिल्हय़ाचे संपर्क अध्यक्ष साईनाथ दुग्रे, जिल्हाध्यक्ष अभय साळुंके, संतोष नागरगोजे, राजकुमार होळीकर, डॉ. नरसिंह भिकाणे, गणेश गवारे, भास्कर औताडे, फुलचंद कावळे, ओम पुणे उपस्थित होते. दि. १ डिसेंबपर्यंत ५ दिवस हे प्रदर्शन चालणार आहे. मनसेतर्फे राज्यात प्रथमच याचे आयोजन केले आहे.
जीन पँट घालून ट्रॅक्टर चालवणारा शेतकरी आपल्याला पाहायचा आहे, या राज ठाकरे यांच्या विधानाची राज्यभर खिल्ली उडवली गेली. यांना शेतीतील काय कळते? अशी टीका केली गेली. त्याच मनसेने राज्यात कोणाचेही अनुदान न घेता स्वतच्या ताकदीवर राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन भरवले. या प्रदर्शनामुळे मनसे शहरी भागात आहे अशी टीका करणाऱ्यांना परस्पर उत्तर मिळाले आहे, असे आमदार दरेकर म्हणाले.
अभ्यंकर यांनी, हे प्रदर्शन हा लातूर पॅटर्न असून टप्प्या-टप्प्याने इतर जिल्हय़ांत कृषिप्रदर्शन भरवता येतील, असे सांगितले. माजी आमदार चव्हाण यांनी, शेतकऱ्यांची गरज राज्य सरकारने कधीच भागवली नाही. निसर्गाच्या पावसापेक्षा सरकारच्या घोषणांचा पाऊस दरवर्षीच असतो. विरोधी पक्षातही दम राहिला नाही, अशी टीका केली.