‘गोविंदा…गोपाळा’च्या गजरात मिरजेच्या कन्या महाविद्यालयातील बालगोपाल ग्रुपच्या ज्योती हिरेमठने दहीहंडी फोडताच उपस्थित शेकडो महाविद्यालयीन मुलींनी जल्लोष केला. बालगोपालने तीन थरांची रचना करून दहीहंडी फोडली.
कन्या महाविद्यालयात गुरुवारी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे कार्यवाह सुधीर गोरे आणि उपप्राचार्य आशालता शिंदे यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन झाल्यानंतर दहीहंडीच्या खेळास सुरुवात झाली. बालगोपालसह कन्हैया, छावा आणि सर्वोदय अशा चार मंडळांनी त्यामध्ये सहभाग घेतला होता. प्रत्येक मंडळात २५ मुलींचा सहभाग होता.
कन्हैया मंडळाच्या नीलम पाटील हिने दोन वेळा दहीहंडीला स्पर्श केला, मात्र तिला दहीहंडी फोडण्यात यश आले नाही, तर सर्वोदय मंडळाच्या प्रगती जगताप हिने उंचावर बांधलेल्या दहीहंडीला बासरीचा स्पर्श केला मात्र तिलाही दहीहंडी फोडता आली नाही.
प्रत्येक संघाला प्रथम सलामीची संधी दिली. छावा ग्रुपनेही बाजी मारण्याचा प्रयत्न केला. अखेर चिठ्ठय़ा टाकून बालगोपाल आणि कन्हैया या संघांना प्रथम संधी देण्यात आली. या दोन्ही संघांनी दहीहंडी फोडण्यासाठी जोरदार प्रयत्न केले. प्रथम क्रमाकांचे एक हजार रुपयांचे बक्षीस प्रा. अरिवद पाटील यांनी ठेवले होते.
बालगोपाल व कन्हैया या दोन मंडळांना प्रथम व द्वितीय क्रमाकांचे बक्षीस विभागून देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस छावा ग्रुपच्या सावित्री हजारे हिला देण्यात आले. सर्वोदय ग्रुपला उत्तेजनार्थ बक्षीस देण्यात आले. या वेळी महाविद्यालयाचे वरिष्ठ विभागाचे उपप्राचार्य महादेव खतकर आणि कनिष्ठ विभागातील सर्व प्राध्यापक, प्राध्यापिका उपस्थित होत्या.