अभियंत्याच्या खुर्चीवर ठिय्या मांडण्याचे प्रहार संघटनेचे आंदोलन आज अखेर यशस्वी ठरले असून शुक्रवारपासून भारनियमन बंद करण्यासह अन्य मागण्या आज तत्परतेने मान्य करण्यात आल्या.
विद्युत कंपनीच्या तळेगाव फिडरवरून १३ तासांचे भारनियमन करण्यात येत होते. भर उन्हाळयातील भारनियमाने नागरिक त्रस्त झाले होते. त्याची दखल घेत प्रहार संघटनेने विद्युत कंपनीच्या आर्वीच्या कार्यकारी अभियंत्याच्या कार्यालयापुढे ठिय्या आंदोलन सुरू केले.
सहा मेपर्यंत मुदत देऊनही मागण्या मान्य न झाल्याच्या निषेधार्थ हे    आंदोलन  चालले. आज प्रहारचे    अध्यक्ष बाळा जगताप यांनी अभियंत्याच्या    खुर्चीवर   ठाण मांडले.
इतर कार्यकर्त्यांनी कार्यालयास घेराव केला. पेच उद्भवल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांची चर्चा झाली. शुक्रवारपासून भारनियमन बंद करण्याची हमी मिळाली. तसेच रोहणा येथील नागरिकांना वीज बिलांचा भरणा करण्यासाठी आर्वीपर्यंत पायपीट करावी लागत आहे.
त्या अनुषंगाने आता रोहणा येथेच विद्युत कंपनीचा कर्मचारी रोज सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत बिल स्वीकारेल, असेही अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.