गोंदिया-भंडारा जिल्ह्य़ाच्या सीमेवर सोनझरी तलावाकाठी नरभक्षक असल्याच्या संशयावरून वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्याची गंभीर दखल नेदरलॅंडच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी खासदार मनेका गांधी यांनी घेतली आहे. स्थानिक वन्यजीवप्रेमींनी यासंदर्भातील तक्रार या संस्थेकडे केल्यानंतर या घटनेची दखल घेण्यात आली.
गेल्या शनिवारी सोनझरी तलावाच्या काठावर पट्टेदार वाघिणीला गोळ्या घालून ठार करण्यात आले होते. प्रत्यक्षात नरभक्षक वाघाला गोळ्या घालण्याऐवजी रेस्क्यू सेंटरमध्ये ठेवून त्याच्यावर उपचार करण्याची गरज आहे, मात्र राज्यात मुंबई वगळता इतरत्र कुठेही रेस्क्यू सेंटर नसल्याने ही समस्या उद्भवली आहे. यापूर्वीही चंद्रपूर जिल्ह्य़ात वाघाला अशाच प्रकारे गोळ्या घालण्यात आल्या होत्या. त्याचीच पुनरावृत्ती गोंदियात झाल्याने संतप्त झालेल्या वन्यजीवप्रेमींनी एकत्र येऊन मनेका गांधी व नेदरलॅंडच्या इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीसकडे तक्रार दाखल केली. ई-मेल व्दारा ही तक्रार केल्यानंतर ती दाखल करून घेऊन आज मेलव्दारेच पोच पाठविण्यात आली आहे.
वाघिणीला गोळ्या घालून ठार केल्यानंतर ग्रीन प्लॅनेट सोसायटी, अंधारी फाऊंडेशन, वाईल्ड केअर, पृथ्वी मित्र निसर्ग संस्था, पीपल फॉर अ‍ॅनिमल, फ्रेन्डस ऑफ ताडोबा व वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन सोसायटी या संस्थेचे सर्व सदस्य येथील भवानजीभाई शाळेत एकत्र आले होते. या सर्वानी मिळून आता वाघांच्या अस्तित्वासाठी लढाई सुरू केलेली आहे.
राज्य शासन, तसेच वनखात्याविरोधात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय न्यायालयात व युनोकडे याचिका दाखल करून निर्णयाविरोधात संपूर्ण राज्यात मोहीम छेडण्याचा निर्णय स्थानिक वन्यजीवप्रेमींनी घेतला आहे.
 ब्रम्हपुरी वन विभागात पाच वर्षांपूर्वी अशाच पध्दतीने वाघाला गोळ्या घालण्यात आल्या होत्या. प्रत्यक्षात या सर्व घटनांमध्ये वाघ गावात येत नसून माणूसच जंगलात जात असल्याने हल्ले होत आहेत.
त्यातही वाघांची संख्या झपाटय़ाने कमी होत असल्याने केंद्र शासनाने ‘वाघ बचाओ’ मोहीम सुरू केली असताना येथे राज्य शासन ‘ऑपरेशन टायगर  किलिंग’ राबविते, ही अतिशय लाजिरवाणी बाब असल्याचे वन्यजीवप्रेमींनी सांगितले.