पत्नीने माहेरहून दोन लाख रुपये व दोन तोळे सोने आणावे यासाठी छळ केल्याप्रकरणी पती, सासू व नणंद यांना राजारामपुरी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांना न्यायालयात उभे केले असता जामीनावर मुक्तता करण्यात आली. याबाबत मिथिला वैभव हणमशेट (वय २८) या विवाहितेने फिर्याद दिली होती. तिने पती वैभव विलास हणमशेट, सासू विद्या व अविवाहित नणंद वर्षां यांनी जुलै २०१२ ते मे २०१३ या कालावधीत शारीरिक, मानसिक छळ केल्याचे म्हटले आहे. मधुमेहाने आजारी असलेल्या पतीला तिने इंजेक्शन घेताना पाहिले होते. त्याची विचारणा केल्यावर उत्तर देण्याऐवजी पती, सासू व नणंद यांनी तिला मारहाण केली. विवाहावेळी मिथिलाला माहेरच्या लोकांनी १० तोळे सोने दिले होते. तिने माहेरहून आणखी दोन तोळे सोने व दोन लाख रुपये आणावेत यासाठी तिघांनी छळ सुरू केला होता.
सोनसाखळी पळवली
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडील सोनसाखळी पळविण्याचा प्रकार रविवारी सायंकाळी घडला. याबाबत ताहीर बशीर मुल्ला (वय १९ रा.काटकर मळा, मुळ गडहिंग्लज) याने मंगळवारी राजारामपुरी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली. ताहीर हा शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेतो. २१ जुलै रोजी रात्री मेसमध्ये जेवण करून तो एसटी कॉलनीतून पायी निघाला होता. रस्त्यामध्ये मागून आलेल्या तरुणांनी त्याच्याशी गप्पा मारण्यास सुरुवात केली. गळ्यातील सोनसाखळी पाहून ती कोठून घेतली अशी विचारणा करीत त्या तरुणांनी सोनसाखळी खेचून पोबारा केला.