वाचन संस्कृती लोप पावत चालल्याने समाज सकस वाचनापासून दुरावत आहे, अशी खंत व्यक्त करताना वाचन संस्कृती जोपासण्याचे आवाहन हास्यकवी अशोक नायगावकर यांनी केले.
अंबाजोगाई येथील कवी दिनकर जोशी यांनी लिहिलेल्या ‘आयुष्याचे अवघड ओझे’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन कवी नायगावकर, प्रा. फ. मुं. शिंदे यांच्या उपस्थितीत झाले.
या वेळी राज्य पणन महासंघाचे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी, आमदार पृथ्वीराज साठे, साहित्यिक भास्कर बडे, वासुदेवराव जोशी, मंगला जोशी आदी उपस्थित होते. वास्तव व सत्य अंगीकारून मानवी मनाची सल पकडून अस्सल निर्मिती ‘आयुष्याचे अवघड ओझे’ या कवितासंग्रहातून झाली आहे, असे मत प्रा. फ. मुं. शिंदे यांनी या वेळी व्यक्त केले.
सत्य अंगीकारून मानवी मनाची सल पकडून अस्सल अशी निर्मिती जोशी यांच्या काव्यसंग्रहातून झाली आहे. शिक्षक हा सामाजिक आईची भूमिका करतो. तो आशय व गीतरचनांचा या कवितासंग्रहात समन्वय साधला आहे, असेही ते म्हणाले.
अनुभवातून जी येते ती कविता. विलक्षण वास्तव व यातनामय प्रवास, व्यवस्थेतील दोषावर प्रवाह, समाजमनाचा वेध दिनकर जोशी यांच्या अनेक कवितांमधून घेतला गेला आहे, असे नायगावकर यांनी सांगितले. अशोक खंदारे, गीता जोशी, सारा जोशी यांनी जोशी यांच्या कविता सादर केल्या. प्रास्ताविक राजकिशोर मोदी यांनी केले.