जायकवाडीसाठी निळवंडे धरणातून पाणी सोडण्याच्या निर्णयाविरोधात संतप्त शेतकऱ्यांनी आज लोणी येथे दोन तास रास्ता रोको आंदोलन केले. लोणीत दुपापर्यंत कडकडीत बंदही पाळण्यात आला. जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन करण्यात आले. दरम्यान, आज ओझर बंधाऱ्यातून कालव्यात सोडलेले पाणी पाटबंधारे विभागाने बंद केल्याने शेतकऱ्यांनी नदीपात्रातील जायकवाडीला जाणारे पाणी कालव्यात वळविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी तो हाणून पाडला.  
लोणी खुर्द आणि बुद्रुक येथे शेतकऱ्यांनी संगमनेर रस्ता अडवून सुमारे दोन तास अडवून धरला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, राष्ट्रवादीचे गोकुळ धावणे, मुळा प्रवरा कामगार युनियनचे गोरक्ष विखे, शांतिनाथ आहेर आदींची भाषणे झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदामंत्री सुनील तटकरे यांच्या प्रतीकात्मक पुतळय़ाचे दहन केल्यानंतर नायब तहसीलदार राहुल कोताडे, लोणीचे पोलीस निरीक्षक देवीदास पवार आणि पाटबंधारे विभागाच्या लोणी शाखेचे अभियंता एन. बी. लोंढे यांना आंदोलकांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
बाळासाहेब विखे यांना साकडे
पाणीप्रश्नाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्या नेतृत्वाखालीच शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो. आंदोलनाचे नेतृत्व करण्यासाठी त्यांनाच साकडे घालण्याचे आवाहन राहाता पं.स.चे उपसभापती सुभाष विखे यांनी केले.