जोखीम पातळीनुसार विम्याच्या संरक्षणाचे स्वरूप आणि हे संरक्षण देणे विमाप्रदात्या कंपनीलाही महाग पडू नये असे त्याचे दर ठरविणाऱ्या मूल्यमापनाची एक विमागणिती पद्धत आहे. ‘अ‍ॅक्च्युरिअल सायन्स’ नावाने विकसित असे हे शास्त्रच आहे. त्यात पारंगत असलेल्या देशातील पहिल्या पिढीतील काही मोजक्या मंडळींमध्ये जगदीश साळुंखे यांचे नाव प्राधान्याने घ्यावे लागेल. त्यांच्या या तज्ज्ञतेमुळेच देशातील सर्वात मोठय़ा विमा कंपनीचे अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (एलआयसी) अध्यक्षपदापर्यंत ते पोहोचू शकले.

मुंबईतील सिडनहॅम वाणिज्य महाविद्यालयातून साळुंखे यांनी पदवी घेतली. म. गो. दिवाण (जे पुढे एलआयसीचे अध्यक्षही बनले) यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनाने त्यांनी अकाऊंट्सऐवजी अ‍ॅक्च्युरिअल सायन्स हा विषय जाणीवपूर्वक निवडला. पुढे साळुंखे यांनी लंडनच्या ‘इन्स्टिटय़ूट ऑफ अ‍ॅक्च्युअरीज’ची फेलोशिप मिळवली. त्या काळी विमागणिती बनायचे तर लंडनमधील या संस्थेची परीक्षा पास करण्याशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे नव्हता. त्या वेळी एलआयसीच्या अध्यक्षपदी अ‍ॅक्च्युरिअल फेलो (एफआयए)ची वर्णी लागण्याचाच प्रघात होता आणि त्यातील बहुतेक हे दिवाण यांचेच शिष्य होते. किंबहुना पहिल्या पिढीतील (साठीच्या दशकात अगदी शंभराच्या घरात भरतील इतके) भारतीय अ‍ॅक्च्युअरीज हे बहुतांश मराठीच होते.

nagpur government dental college marathi news
नागपूर : शासकीय दंत महाविद्यालयात पदव्युत्तरच्या सर्वाधिक जागा
job news loksatta, loksatta job vacancy news
नोकरीची संधी : नवोदय विद्यालय समितीतील भरती
Suicide student
जळगावात परिचारिका महाविद्यालयातील विद्यार्थिनीची आत्महत्या
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

एलआयसीने आपली सुवर्णमहोत्सवी वाटचाल पूर्ण केली आहे. या काळात तिचे अध्यक्षपद भूषविणाऱ्या उण्यापुऱ्या ३५ जणांपैकी साळुंखे हे तिचे २० वे अध्यक्ष (१९९४ ते १९९७) होते. आधीची दोन वर्षे ते व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होते. अनेकांगाने त्यांच्या नेतृत्वाचा कार्यकाळ मोठय़ा संक्रमणाचा आणि वेगवान बदलांचा होता. देशात खुलीकरणाचे वारे सुरू होते. मुख्यत: वित्तीय सेवा क्षेत्रात अनेक बदल आघातासारखे कोसळत होते. संपूर्ण संगणकीकरणाच्या सुरुवातीचाही तोच काळ. शिवाय खासगी आयुर्विमा कंपन्यांना मुभा द्या, अशी शिफारस करणारा अहवाल आर. एन. मल्होत्रा समितीने १९९४ साली सरकारला सोपविला होता. कर्मचाऱ्यांमधील असुरक्षिततेची भीती दूर करून त्यांची समजूत काढणे, त्याच वेळी संस्थेला व्यावसायिक आघात आणि नव्याने येऊ घातलेल्या स्पर्धेपासून अबाधित राखण्याचे दुहेरी आव्हान साळुंखे नेतृत्वस्थानी होते म्हणून पेलता आले, म्हटल्यास वावगे ठरू नये. मनमिळाऊ साधेपणा, प्रत्येकाशी जवळिकीचे संबंध कायम जपलेला सकारात्मक दृष्टिकोन अशा काही गुणांमुळे कर्मचारी-अधिकारी वर्गातून कमावलेल्या स्नेहभावामुळेच त्यांना हे शक्य झाले.

भारतात विम्याच्या सार्वत्रिकीकरणाचा पहिला प्रयत्न अर्थात गटसमूह योजनांची संकल्पना आणि त्याची एलआयसीकडून सुरुवात साळुंखे यांच्याकडून झाली. भारताच्या विमा उद्योगासाठी महत्त्वाचा मानबिंदू ठरेल असे हे कार्य आहे. साळुंखे हे वृद्धापकाळाने शनिवारी आपल्यातून निघून गेले हे दु:खदच. परंतु देशाच्या विमा व्यवसायाच्या घडणीत तब्बल ४० वर्षांहून अधिक काळाचे महत्त्वाचे योगदान असूनही त्यांचे जाणे हे एलआयसीच्या संचार-संपर्क विभागाच्या दृष्टीने दखलपात्र ठरू नये हे अधिक क्लेशकारक आहे.