महाराष्ट्रात १९६० नंतरचा कालखंड हा साहित्यिक-सामाजिक क्षेत्रांत नव्या परिवर्तनवादी विचारांच्या बीजपेरणीचा कालखंड मानला जातो. त्याचा दृश्य परिणाम पुढच्या १९७० च्या दशकात दिसू लागला. साहित्यातील बंडखोर सामाजिक-सांस्कृतिक परिवर्तनासाठी मैदानात उतरले होते. त्यातील एका लाटेचे नाव हुसेन जमादार. कोणत्याही प्रकारचा कट्टरतावाद हा विनाशाकडेच जातो. धार्मिक कट्टरतावाद अधिक घातक व विध्वंसक असतो. त्याला पुन्हा रूढी-परंपरांचा मुलामा दिल्यामुळे त्यात अडकलेल्या समाजाची सुटका करणे फारच कठीण काम असते. जमादार यांनी ते काम आपले जीवितकार्य म्हणून अंगावर घेतले होते. मुस्लीम धर्मातील सुधारणेसाठी १९७० च्या दशकात समाजवादी विचारवंत हमीद दलवाई यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ सुरू झाली, परंतु त्याला त्या धर्मातील कट्टरतावाद्यांकडून विरोध होत राहिला. त्या वेळी कोल्हापूर परिसरात मुस्लीम समाजाच्या प्रश्नांवर काम करणारे हुसेन जमादार हमीदभाईंच्या संपर्कात आले व त्यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्याला झोकून दिले. मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या माध्यमातून त्यांनी सुभाष जोशी, सुरेश शिपूरकर आदी अनेक समविचारी कार्यकर्त्यांच्या सहकाऱ्याने मुस्लीम समाजात वैचारिक प्रबोधनाची चळवळ सुरू केली. १९८०-९० च्या दशकात शहाबानो प्रकरणाने देशाचे राजकारण व समाजकारण ढवळून निघाले. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी मतांचा हिशेब करून मुस्लीम स्त्रियांना गुलामाची वागणूक देणारी एक अनिष्ट प्रथा कायद्याने संपुष्टात आणण्याची मिळालेली संधीच मारून टाकली. त्या वेळी हुसेन जमादारासारखा सजग कार्यकर्ता अस्वस्थ होणे स्वाभाविक होते. त्यांनी तलाकपीडित महिलांचे मोर्चे काढून सरकारचे या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी तलाकपीडित महिला व त्यांच्या मुलांसाठी वसतिगृहे काढली. नाइलाजाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठीही ते मदत करीत राहिले. मराठी साहित्यामध्ये आत्मचरित्रांचा एक मोठा प्रवाह आला. हुसेन जमादारांच्या ‘जिहाद’ (अन्यायाविरुद्ध लढा, या अर्थाने) या पुस्तकानेही समाजव्यवस्थेला धक्के दिले. अलीकडे त्यांनी ‘सलोखा भाईचारा मंच’ स्थापन करून नव्याने काम सुरू केले होते. इतके करूनही स्व-समाजातून अपेक्षित-सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे नैराश्य त्यांना आले होते. अशा अवस्थेतच त्यांनी मृत्यूला जवळ केले. त्यांचे जाणे परिवर्तनाच्या चळवळींना चटका लावून गेले.