मुलांच्या बाबतीत बाईला जबाबदार धरण्याआधी लोकांनी बाईच्या जीवनातल्या शारीरिक आणि मानसिक बदलाचा विचार करायला हवा. पाळी आल्यावर, गरोदर राहिल्यावर, बाळंतपण झाल्यावर, पाळी जाताना अशा अनेक टप्प्यांवर बाईला नैराश्य घेरत असतं. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं पालनपोषण, घरच्या जबाबदाऱ्या यांमुळे नव्या आयुष्याशी जुळवून घेताना व नवीन आव्हानांशी सामना करताना बहुतेक तरूण माता बाळाच्या जन्मानंतर नैराश्यातून जात असतात. जर संसार पती आणि पत्नी दोघांचा असेल, तर मुलांच्या जडणघडणीला दोघांना जबाबदार धरलं पाहिजे. मुलांना संस्कार देण्याचं काम एकट्या बाईचं नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुलांच्या बाबतीत एकट्या बाईला जबाबदार धरणं लोकांनी आता थांबवायला हवं. एक माणूस म्हणून तिचा विचार करायला हवा.

“ चैन्नईमध्ये एका आईनं लोकांचे टोमणे आणि सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला कंटाळून आपलं जीवन संपवलं. एखाद्याच्या वाईट शब्दांनी त्या व्यक्तीला एवढं भावनिक बोचकारलं गेलं की त्या व्यक्तीला आपलं जीवन संपवावं लागलं. आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या रम्याच्या हातातून आठ महिन्याचं तिचं बाळ स्तनपान करत असताना कुशीतून सटकलं व बाल्कनीतून पहिल्या मजल्याच्या छतावर पडलं. सुदैवाने बाळं वाचलं. पण त्या घटनेनंतर रम्याला तिच्या निष्काळजीपणाबद्दल लोकांनी सतत टोमणे मारणं चालू केलं. त्यात बाळ पडल्याचा व्हिडियो व्हायरल झाल्यानं बाळाला वाचविणाऱ्याच्या कौतुकाबरोबर रम्याला सारखं ट्रोल केलं जाऊ लागलं. आधीच आपल्या बाळाला आपण मरणाच्या दारात ढकलल्याचं शल्य तिच्या मनाला टोचत होतंच. त्यात भरीस भर लोकांच्या टोमण्यांनी आणि सोशल मीडियाच्या ट्रोलिंगनं रम्या पार खचली. यातून आलेल्या नैराशातून तिनं आत्महत्या केली. ज्या लोकांचा रम्याशी काहीही संबंध नव्हता, त्या लोकांनी रम्याला ट्रोल करण्याची काही गरज नव्हती. पण हल्ली सोशल मीडियावर लोकांना विचार न करता उगाचचं आपलं मत मांडण्याची सवय लागली आहे. ट्रोल करण्यापूर्वी त्यांनी साधा विचार करायला हवा होता की, जी आई प्रसव वेदना सहन करून बाळाला जन्म देते, जी आई आपल्या मुलाला जीवापाड जपते, ती जाणीवपूर्वक निष्काळजीपणा करेल का? रम्याच्या हातून बाळ निसटलं होतं, तिनं ते मुद्दाम पाडलं नव्हतं. आठ महिन्यांचं बाळ हे चुळबुळत असतं. ते बऱ्याचदा उसळी मारतं. असंच काहीतरी झालं असावं आणि बाळ पडलं असावं. गेल्या वर्षी पावसाळ्यात फाटकात पाणी तुंबल्यामुळे रेल्वे मधेच थांबली, तेव्हा फाटकातून चालताना एका पुरूषाच्या हातातून लहान बाळ निसटून नाल्यात पडलं होतं. त्या पुरूषाला एवढं ट्रोल केलं गेलं होतं का? रम्याला एक स्त्री म्हणून जास्त ट्रोल केलं गेलं आहे. याला कारण आपली परंपरागत बाईविषयी असणारी मानसिकता आजही फारशी बदललेली नाही आहे.

हेही वाचा >>>मासिक पाळीत मुंबईतील मुलींची कुचंबणा, सॅनिटरी नॅपकिन्स बदलणंही मुश्किल; शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी नेमकी समस्या काय?

स्त्री म्हणून जन्माला आल्यापासून बाईवर कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक अशा विविध जबाबदाऱ्या टाकल्या जातात. त्यातच निसर्गानं तिच्यावर प्रजोत्पादनाची जबाबदारी पुरूषापेक्षा जास्त टाकल्यामुळे जन्माला आलेल्या बाळाच्या संगोपनाची संपूर्ण जबाबदारी नेहमीच स्त्रीवर जास्त दिली गेली आहे. त्यामुळे त्या बाळाच्या जीवनात भलेबुरे जे काही घडते त्याची जबाबदारी त्या बाळाच्या आईवर जास्त ढकलली जाते. अपत्यं चुकीचं वागलं, त्यानं समाजविघातक कृत्य केलं, त्याची शैक्षणिक प्रगती झाली नाही अशा सगळ्याचं बाबतीत नेहमीच बाईलाच जबाबदार धरलं जातं… खरंच मुलांच्या बाबतीत घडणाऱ्या वाईट गोष्टींचं खापर एकट्या बाईवर फोडणं बरोबर आहे का? कुटुंबातील इतर लोक, मित्रमंडळी, नातेवाईक, समाजमाध्यमं इत्यादींमुळे मुलांच्या जीवनात वाईट गोष्टी घडत नाहीत का? मग वर्षानुवर्ष बाईलाचं जबाबदार समजून समाज दुषणं का देतो? या सगळ्या गोष्टींचा विचार सगळ्यांनी करायला हवा.

आपल्याकडे आजही पुरूषप्रधान संस्कृती असल्यानं बाईला डावल्याचे, जाणीवपूर्वक तिला लक्ष्य करण्याचे प्रकार सर्रास होत असतात. एखाद्या मुलाला शाळेत चांगले गुण मिळाले नाहीत तर लोक सहज बोलतात की, आईनं लक्ष दिलं नसेल…एखादं मूल आजारी पडलं तर घरचे आईलाचं धारेवर धरतात. मुलं व्यसनाधीन झाली, गुन्हेगार झाली तर समाज म्हणतो की, आईनं चांगलं वळण लावलं नाही. आजही मुलगी सासरी नांदायला गेल्यावर तिला काही काम जमलं नाही, तिच्याकडून काही चुका झाल्या तर आईनं संस्कार केले नाहीत अशी दुषणं दिली जातात. पूर्वी अशी दुषणं देणारे मर्यादित होते. डिजिटल जगात ते ही संख्या वाढली आहे. एखाद्याला ट्रोलकरून लोक जगणं मुश्किल करता आहेत.

हेही वाचा >>>“…वाढदिवस साजरा केला जातो मग मासिक पाळी का नाही?” काय आहे ‘मासिका महोत्सव’ जाणून घ्या

मुलांच्या बाबतीत बाईला जबाबदार धरण्याआधी लोकांनी बाईच्या जीवनातल्या शारीरिक आणि मानसिक बदलाचा विचार करायला हवा. पाळी आल्यावर, गरोदर राहिल्यावर, बाळंतपण झाल्यावर, पाळी जाताना अशा अनेक टप्प्यांवर बाईला नैराश्य घेरत असतं. बाळ जन्माला आल्यानंतर त्याचं पालनपोषण, घरच्या जबाबदाऱ्या यांमुळे नव्या आयुष्याशी जुळवून घेताना व नवीन आव्हानांशी सामना करताना बहुतेक तरूण माता बाळाच्या जन्मानंतर नैराश्यातून जात असतात. त्यालाच पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतात. हे असं नैराश्य ७५ टक्के बायकांमध्ये दिसत असतं. आपल्या शाऱीरिक व मानसिक समस्यांवर मात करत बाई आपल्या मुलांचं संगोपन करत असते, संसार करत असते. जर संसार पती आणि पत्नी दोघांचा असेल, तर मुलांच्या जडणघडणीला दोघांना जबाबदार धरलं पाहिजे. मुलांना संस्कार देण्याचं काम एकट्या बाईचं नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. त्यामुळे मुलांच्या बाबतीत एकट्या बाईला जबाबदार धरणं लोकांनी आता थांबवायला हवं. एक माणूस म्हणून तिचा विचार करायला हवा. समाजमाध्यमांवर मुलांच्या बाबतीत एखाद्या बाईला ट्रोल करताना लोकांनी तिच्या मानसिक स्थितीचा जरूर विचार करायला हवा.

mukatkar@gmail.com