“नेहमीच्या ट्रेनला नेहमीप्रमाणे उशीर झाला होता. त्यामुळे सेकंदागणिक फलाटावरची गर्दी वाढत गेली. आलेल्या ट्रेनमध्ये चढायला मिळेल की नाही याची शाश्वती नव्हती. पण ही ट्रेन चुकली तर दिवसभराचं गणित चुकणार होतं. पुढचा संपूर्ण दिवस मग धावपळ करावी लागते. ती दिवसभराची धावपळ टाळण्यासाठी ठरलेली ट्रेन पकडावीच लागते. पण ही ट्रेन वेळेत येईल तर शपथ ना…” रसिकाच्या मनात हे विचार सुरू होते. तेवढ्यात व्हॉट्सअॅपमधला ग्रुप खणाणला. “रसिका, ट्रेनमध्ये गर्दी आहे. आता डोंबिवलीला येईल ट्रेन, लागलीच चढ, पटकन पुढे ये. आम्ही जागा अडवून ठेवलीय.” तिने तो मेसेज वाचला आणि सुटकेचा निश्वास सोडला. पण आजूबाजूची गर्दी पाहता ट्रेनमध्ये चढायला मिळण्याची शाश्वती फार कमी होती. तिने फलाटावरून थोडंसं वाकून पाहिलं, ट्रेन येताना तिला दिसली. तिने लांबूनच ट्रेनला दोन्ही हात जोडून नमस्कार केला. साडी खोचली. मोबाईल पर्समध्ये टाकला आणि पर्स एका काखेत घट्ट रोखून धरली. तेवढ्यात ट्रेन तिच्यासमोर आली. ट्रेन थांबायच्या आतच तिने ट्रेनमध्ये धाव घेतली आणि लागलीच पुढे जाऊन आपल्या ग्रुपच्या सानिध्यात सामील झाली.

आजचा दिवस मार्गी लागला. ठरलेली ट्रेन पकडली आणि घाटकोपरची सीट (बसायला) मिळाली. रसिका ट्रेनमध्ये चढली तरी तिच्यासोबतच्या अनेकजणी चढू शकल्या नाहीत. तिला उगीच वाटून गेलं, जरा एक मिनिट ट्रेन थांबली असती तर सगळ्याचजणी चढल्या असत्या की. प्रत्येकीची घाई असते, घरातलं आवरून यायचं, ट्रेनमधली गर्दी सहन करायची आणि ऑफिसमध्ये जाऊन बॉसची बोलणी खायची. या सर्व प्रयत्नात निदान ठरलेली ट्रेन तरी मिळावी. पण ट्रेन अवघे काही सेकंद थांबते आणि जितके प्रवासी ट्रेनमध्ये चढतील त्यांना घेऊन निघून जाते. त्या जाणाऱ्या ट्रेनकडे पाहत अनेक प्रवासी खंत करीत बसतात.

Shukra Gochar in Mesh
२४ तासांनी ‘या’ ६ राशींच्या नशिबाला मिळेल श्रीमंतीची कलाटणी? शुक्रदेवाच्या कृपेमुळे व्यापारात होऊ शकतो मोठा फायदा
Lok Sabha Election, Lok Sabha Election 2024,
डोके ठिकाणावर ठेवून मतदान कराल ना?
why Sleeping Pills Rising Among Young Adults
झोपेच्या गोळ्या निद्रानाशावरचा अंतिम उपाय आहेत का? झोपेच्या गोळ्या शक्यतो घेऊ नका असं डॉक्टर का सांगतात?
Sun Transit In Mesh Rashi
काही तासांत सुर्य करेल मेष राशीत प्रवेश! पाहा, कोणत्या तीन राशींचे नशीब उजळणार? मिळणार भरपूर पैसा अन् प्रसिद्धी

त्या गर्दीतून वाट काढत रसिका स्थिरस्थावर झाली. तेवढ्यात फलाटावरची गर्दी, ट्रेनमध्ये चढण्याच्या करामती या नेहमीच्या विषयावरच्या गप्पा ग्रुपमधल्या बायकांमध्ये सुरू झाल्या. रसिकाही त्यात सामील झाली. पण तरी तिला वाटत होतं की एक मिनिट तरी ट्रेन थांबायला हवी. यासंदर्भात तिने ग्रुपसमोर सहज विषय काढला. “आपण उद्यापासून मोटरमनला विनंती करून पाहुयात का ट्रेन जरा जास्तीवेळ थांबण्यासाठी? डोंबिवलीत तुफान गर्दी असते. कितीही ठरवलं तरी आयत्या वेळेला ट्रेन पकडता येत नाही. ९.२३ ची ट्रेन पकडायला फलाटावर ९.१० वाजल्यापासून उभं राहावं लागतं. फलाटावर पुढच्या रांगेत जी उभी असेल तिलाच ट्रेनमध्ये चढायला मिळतं. बाकीच्या बाहेरच राहतात.” तेवढ्यात दुसरी म्हणाली, “आपली विनंती तो मोटरमन ऐकणार आहे का? त्यांचं सरकार जसं नियम बनवेल तसं ते ऐकतात. आपण विनंती केल्याने काय होणार आहे?” मग रसिकाला कल्पना सुचली, “दोन दिवसांनी रक्षाबंधन आहे ना. आपला रोजचा प्रवास सुखाचा करणाऱ्या या मोटरमनला आपण राखी बांधली तर? निदान डोंबिवलीतल्या बहिणींसाठी तरी ते एखाद दुसरा सेकंद जास्तवेळ लोकल थांबवील.” रसिकाच्या या कल्पनेचं सगळ्यांनाच हसू आलं. पण तिची कल्पना चांगली होती. रोजचा प्रवास कितीही धकाधकीचा असला तरीही मोटरमनमुळे इच्छित स्थळी पोहोचता येतं. कधीकधी आपल्या ट्रेनचा चालक कोण आहे हेही अनेकांना माहित नसतं. वर्षानुवर्षे प्रवास करणाऱ्या प्रवाशांनाही मोटरमनचा चेहरा लक्षात नसतो. ट्रेन आली की त्यात उडी मारण्याशिवाय प्रवाशांचं कोणाकडेच लक्ष नसतं, मग मोटरमनच्या केबिनमध्ये कोण माणूस उभा आहे हे कसं पाहिल कोणी? पण त्याच्या कार्याचा सन्मान व्हायला हवा ना.

आपण बहिणी म्हणून त्याच्या कर्तव्याचं कौतुक केलंच पाहिजे. त्यामुळे, रक्षाबंधनाच्या आदल्या दिवशी राखी बांधायचं ठरलं. मग एकजण म्हणाली, प्रत्येकीने ५०-५० रुपये काढा, तेवढेच पाव-किलो पेढे घेऊ. राखीसोबत तोंडही गोड व्हायला हवं. या सगळ्या गप्पाटप्पा सुरू असताना प्रत्येकीच स्टेशन येत गेलं तशा त्या उतरत गेल्या. पण त्यांचा हा संवाद व्हॉट्सअॅप ग्रुपवर सुरू राहिला. दुसऱ्या दिवशी या बायका डोंबिवली स्थानकावर आल्या. नेहमीप्रमाणे तुफान गर्दी होती.या बायका सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या पहिल्या महिला डब्याजवळ उभ्या होत्या. त्या शेजारी मोटरमनची केबिन होती. ट्रेन थांबताच महिलांचा गोंधळ झाला. ट्रेनमध्ये चढावं की मोटरमनला राखी बांधावी. एकीने लागलीच मोटरमनच्या हातात राखी बांधली, एकीने पेढ्यांचा बॉक्स सुपूर्द केला. “तुमचे आभार, रोज आमचा सुखरुप प्रवास होतो त्यामुळे आम्हा बहिणींकडून हे छोटंचं औक्षण. या रक्षाबंधनाची ओवाळणी म्हणून एकच करा, रोज फलाटावर निदान २० सेकंद जास्तवेळ गाडी थांबवा. आमच्यासारख्या असंख्य प्रवाशांना त्यामुळे दिलासा मिळेल.” हे सगळं सांगतानाच त्यांनी टुमकन डब्यात उडी घेतली. बायकांचा हा गोंधळ पाहून मोटरमनलाही हसू आवरेना. पण त्यांनी बांधलेल्या राखीचं अप्रुप वाटलं. मोटरमन आपलं ऐकेल की नाही माहिती नाही, पण निदान आपली विनंती त्याच्यापर्यंत पोहोचली याचं रसिकाला समाधान मिळालं!