आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून त्या त्या क्षेत्रात प्रगती करताना दिसत आहेत, पण तरीसुद्धा महिला सुरक्षिततेचा प्रश्न कायम आहे. गांधीजी म्हणाले होते, “ज्या दिवशी देशातील स्त्री रात्री रस्त्यावर कोणतीही भीती न बाळगता फिरू शकेल, त्या दिवशी आपण खऱ्या अर्थाने म्हणू की भारताला स्वातंत्र्य मिळाले आहे”, पण हा दिवस कधी येणार? दिवसेंदिवस महिलांवरील घरगुती अत्याचार, बलात्कार, अॅसिड हल्ल्यांसारखी प्रकरणे वाढताना दिसत आहेत.

खरंच देशातील स्त्री सुरक्षित आहे का?

भारतात २०१६ ते २०२१ दरम्यान महिलांवरील अत्याचाराची २२.८ लाख प्रकरणे समोर आली होती आणि दररोज हा आकडा वाढत आहे. गेल्या वर्षी ३१,८७८ बलात्काराच्या घटना पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या होत्या, आता ही संख्या १५ टक्क्यांनी वाढली आहे.

देशात महिला सुरक्षा हा खूप गंभीर विषय आहे. महिला ना घरी ना बाहेर, कुठेच सुरक्षित नाही; पण आपल्या भारतीय संविधानाने आणि न्यायव्यवस्थेने महिलांची सुरक्षितता लक्षात घेऊन काही कायदे निर्माण केले आहेत आणि सरकार काही उपक्रम राबवितात. आज आपण महिलांची सुरक्षितता आणि त्यांचे स्वातंत्र्य जपणाऱ्या उपक्रमांविषयी जाणून घेणार आहोत.

हेही वाचा :‘श्रीमंत नवरा पाहिजे’, अशी अपेक्षा महिलांनी जोडीदाराकडून ठेवणे चुकीचे आहे का?

निर्भया फंड (Nirbhaya Fund) –

महिला सुरक्षिततेसाठी निर्भया फंड तयार करण्यात आला आहे. या फंडमध्ये कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून या निधीचा वापर पीडित महिलेला सुरक्षा देण्यासाठी करण्यात येतो.

१८१ हेल्पलाइन (181 Helpline) –

हा एक हेल्पलाइन क्रमांक आहे. कोणतीही अडचण, हिंसाचार किंवा कठीण परिस्थितीत तात्काळ कारवाई करण्यास ही सेवा सक्षम असते. ही सेवा २४ तास उपलब्ध आहे.

वन-स्टॉप सेंटर (One-stop Centre) –

पीडित महिलांसाठी मदत केंद्र म्हणून वन-स्टॉप सेंटर उभारण्यात आले आहे. कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडलेल्या महिला या सेंटरवर थांबू शकतात.

मेरी सहेली (Meri Saheli) –

रेल्वेमध्ये एकटीने किंवा कुटुंबाबरोबर प्रवास करणारी महिला मेरी सहेली या उपक्रमामुळे सुरक्षित प्रवास करू शकते. रेल्वे संरक्षण दलाद्वारे दक्षिण पूर्व रेल्वेमध्ये मेरी सहेली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

निर्भया पथक (Nirbhaya Squad)

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्लीच्या निर्भया बलात्कार प्रकारणानंतर महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुंबई पोलिसांनी विशेष प्रशिक्षित महिला पोलिस अधिकाऱ्यांना घेऊन तब्बल ९१ निर्भया पथक स्थापन केली आहेत. हे पथक फक्त महिलांच्या सुरक्षिततेसाठी २४x ७ कार्यरत असते.

खरं तर महिला सुरक्षित राहणे हा एकमेव उद्देश आहे. याच पार्श्वभूमीवर विविध राज्यांमध्येसुद्धा महिलांच्या सुरक्षेसाठी १८१ आणि ११२ हे दोन हेल्पलाइन क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. या क्रमांकावर कॉल केल्यास महिलांना त्वरीत मदत मिळते. याशिवाय सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी काही अ‍ॅप्स लाँच केले आहेत. हे खालील अॅप्स प्रत्येक महिलेच्या फोनमध्ये असणे आवश्यक आहे.

१. Eyewatch SOS
२. SpotnSave
३. iGoSafely
५. Smart 24×7
६. bSafe
७. Shake2Safety
८. Trakie
९. My SafetyPin