सार्वजनिक क्षेत्रातील ‘राष्ट्रीय केमिकल अ‍ॅन्ड फर्टिलायझर्स’ची (आरसीएफ) मधील १२.५ टक्के हिश्श्याची निर्गुतवणूक केंद्र सरकार भागविक्रीच्या माध्यमातून कमी करणार आहे. ही भागविक्री येत्या शुक्रवारी ८ मार्च रोजी होणार आहे. यातून सरकारकडून ३०० कोटी रुपयांचा निधी उभारले जाणे अपेक्षित आहे.
अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी याबाबतच्या निर्णयाला बुधवारी मंजुरी दिली. यानंतर या प्रक्रियेची माहिती निर्गुतवणूक सचिव रवि माथूर यांनी दिली. १२.५ टक्के हिस्सा विक्रीद्वारे आरसीएफ कंपनीचे ६.८९ कोटी समभाग उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. या कंपनीत सध्या सरकारचा हिस्सा ९२.५ टक्के आहे तर भागभांडवल ५५१.६९ कोटी रुपयांचे आहे. निर्गुतवणुकीच्या माध्यमातून चालू आर्थिक वर्षांत २४,००० कोटी रुपयांच्या निधी उभारणी होण्याची शक्यता आहे. केंद्रीय अर्थसंकल्पात मात्र सरकारचे उद्दिष्ट ३०,००० कोटी रुपये निश्चित करण्यात आले आहे. मार्च २०१३ अखेपर्यंत एमएमटीसी, सेल आणि नाल्कोचीही भाग विक्री प्रक्रिया पार पडणार आहे.