देशाचा आकार, अर्थव्यवस्था, औद्योगिक प्रगती आदी अनेक बाबतीत पाकिस्तानपेक्षा कैक पटींनी पुढे असणाऱ्या भारतातील नागरिकांनीही ती दाखवणे हे आपल्यातील बालिशपणा दर्शवणारे आहे. तेव्हा एखाद्या स्पर्धेत चॅम्पियन ठरलो म्हणून देश डोक्यावर घेण्याचे काही कारण नाही आणि चंपी झाली म्हणून माना खाली घालण्याचेही कारण नाही. खेळास, विशेषत: पाकिस्तानबरोबरच्या, मैदानाबाहेर महत्त्व देणे आपण सोडायला हवे. महासत्ता व्हावयाचे असेल तर आपल्या देभपंनी या क्षुद्र दंभाचा त्याग करायला हवा, अशी भूमिका मांडणाऱ्या २० जून रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘देभपं’चा दंभ या ‘लोकसत्ता’मधील अग्रलेखावर विद्यार्थ्यांना ‘ब्लॉग बेंचर्स’मध्ये व्यक्त व्हायचे आहे. या स्पर्धेअंतर्गत पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना वाचता येतील. वैचारिक निबंध लेखनाचा महाराष्ट्राचा वारसा जपण्यासाठी ‘लोकसत्ता’ने सुरू केलेल्या ‘ब्लॉग बेंचर्स’ या लेखन स्पर्धेसाठी दर आठवडय़ाला एक अग्रलेख निवडला जातो. त्यावर विद्यार्थ्यांनी आपले भाष्य करायचे असते. या आठवडय़ाकरिता ‘देभपं’चा दंभ’ या अग्रलेखाची निवड करण्यात आली आहे. या अग्रलेखावर विद्यार्थ्यांना मत मांडणे सोपे जावे या उद्देशाने ‘लोकसत्ता’चे सहायक संपादक मुकुंद संगोराम आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार वि. वि. करमकर यांना लिहिते केले आहे. त्यांच्या मताचा विद्यार्थ्यांना लिखाणात उपयोग होऊ शकणार आहे. लक्षात ठेवावे असे.. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/blogbenchers या संकेतस्थळाला भेट द्यायची आहे. ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली दर आठवडय़ाला प्रसिद्ध होणाऱ्या लेखाखालीच ‘विद्यार्थ्यांना काय वाटते?’ या मथळ्याखाली विद्यार्थ्यांना भूमिका मांडता येते. या ठिकाणी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सहभागी होता येते. नोंदणीनंतर विद्यार्थ्यांना युजरनेम आणि पासवर्ड दिला जातो. स्पर्धेत सहभागी होण्याकरिता अडचणी आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.