‘आला उन्हाळा, प्रकृती सांभाळा’, असा संदेश सर्वानाच निसर्गदेवता हवेतील वाढत्या तापमानाने देत असते. मार्च-एप्रिलच्या मध्यापर्यत अत्यंत सुखद असा वसंत ऋतू सर्वानाच प्रिय असतो. वसंत ऋतू संपता संपताच हवामानात एकदम बदल होतो, शिशीर ऋतूतील थंडी रेंगाळत संपते. दिवसाचे तापमान एप्रिलअखेर वाढतेच, मे महिन्याच्या सुरुवातीपासून रात्रही खूप गरम राहते. स्वाभाविकच आपण सर्वचजण खूप उकाडा वाढला आहे, असे समजून आहारात एकदम बदल करू लागतो.
आयुर्वेदाप्रमाणे दोन ऋतूंतील पंधरावीस दिवसाचा काळ, पहिल्या ऋतूतील शेवटचा आठवडा आणि नवीन ऋतूतील पहिला आठवडय़ाच्या काळाला ऋतुसंधी म्हणतात. या ऋतुसंधीच्या काळात आपल्या खाण्यापिण्याच्या सवयीत, दैनंदिन राहणीमानात, व्यायाम, विश्रांतीत एकदम खूप बदल करू नये, असे शास्त्रकार सांगतात. आपण उन्हाळा खूप वाढलाय, हवेतील तापमान खूप वाढले, असह्य़ आहे, असे समजून भरपूर थंड पाणी, थंड पदार्थ सेवन करायला सुरुवात करतो. त्याचा परिणाम आपल्या भूकेवर, रुचीवर, अन्नपचनावर होतो.

भरपूर पाणी नको
‘अत्यंम्बुपानाद् मंदाग्ने:’ असे शास्त्रवचन आहे. खूप तहान नसतानाही जर आपण खूप पाणी प्यायला लागलो तर आपला पाचकअग्नी मंद होतो. एकवेळ तुम्ही जास्त भोजन केले, तर ते पचवणे सोपे आहे, पण पाणी, कोल्ड्रिंक, अनावश्यक थंड पेये, आइस्क्रिम, लस्सी असे पातळ पदार्थ पचवायला आपला अग्नि कमी पडतो. स्वाभाविकच मे महिन्याच्या सुरुवातीला उकाडा जाणवतोय म्हणून खूप पातळ पदार्थाचे सेवन केले, तर तोंडाची चव जाते. अगोदरच्या ऋतूत म्हणजेच शिशीर ऋतूत हवाहवासा वाटणारा जड आहार नकोसा होतो. विशेषत: सकाळच्या न्याहरीवर व दुपारच्या जेवणावर परिणाम होतो. अनेक ज्ञानी निसर्गोपचारतज्ज्ञ नेहमी भरपूर पाणी प्यायचा सल्ला देत असतात. त्यातील तत्त्व जरूर घ्यावे.
आपल्या शरीराला जलद्रव्याची निश्चितच आवश्यकता असते. एकवेळ अन्न नसले तरी चालते, पण पाणी समस्त मानवाला हवेच. दिवसभराची हालचाल, श्रम, धावपळ यामुळे शरीरातील आपद्रव्य सतत खर्च होत असते. श्रमजीवी, भरपूर शारीरिक कष्ट करणाऱ्याने भरपूर पाणी जरूर प्यावे, पण जी मंडळ सतत पंख्याखाली राहतात, घर-कार-कार्यालयात एसीचा वापर करतात. शारीरिक श्रम फारसे करत नाहीत. खड्डे खणत नाहीत, ओझी वाहत नाहीत त्यांनी पाणी उगीच सारखे पीत राहू नये.

मीठही नेमकेच हवे
पाण्यासारखाच नियम आपण मीठाच्या बाबतीतही पाळला पाहिजे. शरीराला मीठाची, क्षारांची नितांत गरज असते. शरीरात मीठाची कमतरता झाली की एकदम थकवा येतो, पाय लटपटतात, पोटऱ्या दुखतात. शारीरिक श्रम करणाऱ्याने तर पुरेसे मीठ घ्यावयास हवेच. कारण त्याच्या भरपूर श्रमसंस्कृतीच्या आचरणाने, खूप शारीरिक कष्ट करण्यामुळे, ओझी वाहण्यामुळे शरीरातील मीठ वापरले जाते. पण फारसे शारीरिक कष्ट करत नसणाऱ्यांनी उन्हाळ्यातील उकाडा वाढला तरी आहारातील मीठ निश्चितपणे कमी करण्याची गरज आहे. आपल्या आहारातील लोणची, पापड, तोंडी लावणी यातील मीठाचा वापर उगाचच वाढवू नका. उन्हाळा आलाय म्हणून जेवताना अनेक पदार्थामध्ये जादा मीठ मिसळून तोंडाची चव घालवू नये. अजिबात पाणी वा मीठ टाळावे, असे मी म्हणत नाही. बऱ्याच वेळा ऊसाच्या गुऱ्हाळात गेलेली मंडळी ऊसाच्या रसाच्या ग्लासमध्ये मीठ मिसळताना दिसतात, ते सर्वथा अहितकारक आहे.

रुची महत्त्वाची
आपल्या दैनंदिन जीवनात भूकेपेक्षा आपण रुची या संकल्पनेला जास्त महत्त्व द्यायला हवे. आपल्याला अन्नावरची रुची पुरेपूर आहे ना, याचे भान ठेवायला हवे. बऱ्याचवेळा घरातील पुरुष मंडळी वा बालबच्चे आम्हाला खूप भूक लागली आहे म्हणून मोठय़ा उत्साहात जेवायला पानावर बसतात. पण प्रत्यक्ष जेवताना हात आखडता घेतात. कारण त्यांना अरुची या लक्षणाने घेरलेले असते.

काय खावे?
उन्हाळ्यातील आहाराचे तीन महत्त्वाचे नियम आहेत. ते पाळल्यास आगामी मे महिना निश्चितपणे पुरेसे आहारसुख देईल. भरपेट न्याहरी, हलके दुपारचे जेवन आणि पुरेसे रात्रीचे जेवण असा मंत्र जपणे आवश्यक आहे. सकाळच्या न्याहरीसोबत फार तेलकट, तुपकट मिठाई टाळावी. सुकी चपाती, ज्वारीची भाकरी, कमी तेल तुपाचा उपमा, शिरा जरूर खावा. कमी तेल असणारे पोहे जरूर खावेत. दूध पोहे, दही पोहे उत्तम न्याहरी आहेत. दुपारच्या जेवणात दुधी भोपळा, पडवळ, दोडका, कोहळा, घोसाळी अशा पचायला हलक्या भाज्या वापराव्या. तोंडाला चव राहावी, खाण्याची रुची वाढावी म्हणून पुदिना, आले चटणी खावी. दुपारच्या चहासोबत बिस्कीटे खावी वा नाही, असा प्रश्न ज्याने त्याने आपल्या रुची, भूकेनुसार सोडवावा. रात्रीचे जेवण व्यवस्थित असावे. उन्हाळ्यात सर्वत्र भरपूर फळांची रेलचेल असते. शक्यतो कलिंगड टाळावे. पांढरे खरबूज, ताडगोळे, पपई, सफरचंद, गोड चवीचे संत्रे, मोसंबे असा फलाहार केव्हाही चांगला. द्राक्षांचा मोसम संपत आलेला आहे. मात्र खूप गोड चवीची द्राक्ष झोपण्यापूर्वी खावीत. रात्री जेवणानंतर किमान अर्धा तास चालावे. ‘संयमसे स्वास्थ्य’ या उक्तीप्रमाणे संयम राखल्यास स्वास्थ्य चांगले राहते.

पूर्णब्रह्म
आरोग्याचे तंत्र सांभाळणाऱ्या पदार्थाचा समावेश दररोजच्या आहारात व्हावा यासाठी लोकसत्ता घेऊन आले आहे, तब्बल १२० पाककृतींची माहिती देणारे ‘पूर्णब्रह्म’ पुस्तक. वैद्य खडीवाले यांनी सिद्ध केलेल्या या पाककृती आहेत. आरोग्य आणि रुचिवैविध्याची माहिती या पुस्तकात आहे.