भोगावती सहकारी साखर कारखान्यावरील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सत्तेचे उच्चाटन करण्याचा आणि काँग्रेसची सत्ता आणण्याचा निर्धार रविवारी भोगावती साखर कारखान्याच्या निवडणुकीसंदर्भात परिते (ता. करवीर) येथील कृपासिंधू कार्यालयात आयोजित केलेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. ही निवडणूक स्वबळावर लढण्याचा आणि याबाबतचे सर्व अधिकार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, कृष्णराव किरुळकर यांना देण्याचाही निर्णय यावेळी घेण्यात आला. मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी विद्यमान संचालक मंडळाच्या कारभारावर जोरदार ताशेरे ओढले. भोगावती कारखान्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी ही निवडणूक काँग्रेसच्या नेतृत्वाखाली लढवावी, असे मत अनेकांनी मांडले. जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, कृष्णराव किरुळकर, माजी अध्यक्ष संजय पाटील, बंडोपंत वाडकर, राधानगरी तालुका अध्यक्ष िहदुराव चौगले, गोकुळचे संचालक अरुण डोंगळे, उदयसिंह पाटील (कौलवकर) ए. डी. चौगले, विश्वनाथ पाटील, शिवाजी तळेकर, भोगावती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, बी. ए. पाटील, गोकुळचे संचालक पी. डी. धुंदरे, उदय पाटील (सडोलीकर) आदींची भाषणे झाली. काँग्रेसचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते या मेळाव्यास उपस्थित होते.