शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावे या मागणीसाठी शिवसेनेने आंदोलनाचा दुसरा टप्पा सुरू केला असून सोमवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन ‘कर्जमुक्त होणारच’ या अभियानांतर्गत कंदलगाव (ता. करवीर ) येथे शेतकऱ्याकडून विहित नमुन्यातील अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. या अंतर्गत शिवसेनेचे पदाधिकारी पाच लाख अर्ज गोळा करून पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे देणार असल्याची माहिती जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, मुरलीधर जाधव यांनी यावेळी दिली.

शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी नाशिक येथे कृषी मेळावा घेऊन कर्जमुक्तीसाठी रणिशग फुंकले आहे. ज्याच्या जीवावर आज देशाचा डोलारा उभा आहे, तोच शेतकरी संकटात सापडला असताना सरकार गप्प बसणार असेल तर शिवसेना कदापि सहन करणार नसल्याचे त्यांनी सरकारला ठणकावून सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या भावना व वेदना मुख्यमंत्र्यांना कळाव्यात यासाठी शिवसेनेचे  पदाधिकारी  थेट  बांधावर जाऊन त्यांना धीर देऊन प्रश्नोत्तराच्या स्वरूपात भावना गोळा करणार आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघातून ५० हजार असे जिल्ह्यातून पाच लाख अर्ज एकत्रित करून पक्षप्रमुख ठाकरे यांच्याकडे पाठविणार आहे.

आज, दुपारी कंदलगाव (ता. करवीर) येथून या मोहिमेची सुरुवात झाली. जूनअखेर सह्यांचे सर्व अर्ज पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तीकर व संपर्क प्रमुख अरूण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली सेवाभवनावर देणार असल्याचे संजय पवार यांनी सांगितले. त्यानंतर पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली लाँगमार्च काढून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे शेतकऱ्यांच्या लिखित भावना पोहचविणार असल्याचे देवणे व जाधव यांनी सांगितले. यावेळी  करवीर  तालुका प्रमुख विराज पाटील, राजू यादव, विनोद खोत, सुजित चव्हाण, जिल्हा उप संघटक शुभांगी पोवार, शहर संघटक रिया पाटील, सुनीता निकम यांच्यासह शिवसनिक उपस्थित होते .