भारतास स्थानिक हवामान व अनुकूल प्रेक्षकांचा पाठिंबा मिळणार असला तरी त्याचे कोणतेही दडपण आमच्यावर नाही. येथे आम्ही मुक्तपणे खेळावयास आलो आहोत. वनडेच्या तीनही सामन्यांमध्ये विजय मिळविण्याचा आमचा प्रयत्न राहील, असे पाकिस्तानचा कर्णधार मिसबाह उल हक याने सांगितले. ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत बरोबरी झाल्याचे समाधान वाटत असले तरी थोडेसे अधिक प्रयत्न झाले असते तर आम्ही २-० असा विजय मिळविला असता असे सांगून मिसबाह म्हणाला, आमचे खेळाडू येथे सकारात्मक वृत्तीने खेळावयास आले आहेत. क्रिकेट सामन्यांमुळेच दोन्ही देशांमधील संबंध सुधारतील हाच संदेश आम्ही देणार आहोत. आम्ही भावी काळासाठी संघबांधणी करण्यावर सध्या भर देत आहोत. दोन्ही देशांमधील सामने खूप तणावाखाली खेळले जात असले तरी प्रत्येकाने संयम ठेवावा व आपल्या खेळातूनच आपली जिद्द व तडफदार वृत्ती दाखवावी, असे मी सर्वाना सांगितले आहे.