कोमल आचरेकर, प्राची परांजपे ती येते आणिक जाते.. पण या चार दिवसांत बरंच काही घडवते. ती म्हणजे जिच्याबद्दल बोलताना आपला आवाज नकळत कमी होतो, जिच्याविषयी कायम कुजबुजच करायची असते, असा अलिखित संकेत तयार झालाय, तीच ती मासिक पाळी. खरंतर हा एक साधा शरीरधर्म आहे. पण त्याबद्दल असलेले गैरसमज, अंधश्रद्धा यामुळे त्याचा बाऊ केला जातोय. येणारा २८ मे हा दिवस ‘मेन्स्ट्रअल हायजिन डे’ म्हणून साजरा केला जातोय. कुजबुज ते सेलिब्रेशन अशा या पाळीच्या प्रवासाबद्दल.. एफएमवरच्या आरजेची नेहमीप्रमाणे बडबड चालली होती. त्यातलं एक वाक्य एकदम क्लिक झालं,'पिरिअड्स है कोई पाप नही'. किती खरं आहे हे वाक्य, असं वाटून गेलं. एरव्ही आधुनिकतेच्या गप्पा मारणारे आपण, अशा गोष्टी आल्या की मात्र गप्प होऊन जातो. वयात आल्यानंतर ते रजोनिवृत्ती होईपर्यंत प्रत्येक निरोगी स्त्रीला दर महिन्यात मासिक पाळी येते. तशी ती येणं हा अत्यंत स्वाभाविक शरीरधर्म असतो. पण या चार दिवसांत अनेकजणींना निरनिराळ्या प्रकारचे त्रास होतात. कुणाला शारीरिक त्रास तर कुणाला मानसिक. पण मुळात या विषयावरच बोलण्यावर एक अलिखित सामाजिक बंदी असल्याने त्यादिवसांत होणाऱ्या त्रासाबद्दल तर बोललंच जात नाही. विशेषत: मानसिक. म्हणजे मूड्समध्ये होणारे बदल, सतत चिडचिड होणं इ. पण आता ही परिस्थिती मुंगीच्या पावलाने का होईना बदलतेय. मासिक पाळी हा विषय कुजबूजीपुरता मर्यादित न राहता त्याचं वेगवेगळ्या माध्यमातून सेलिब्रेशन करण्यापर्यंत हा विचार येऊन पोहोचला आहे खरा.. मात्र यानिमित्ताने एकूणच मासिक पाळी ‘पाळणे’ या संकल्पनेपासून सॅनिटरी नॅपकिन कोणते वापरावेत, या काळातील मानसिक बदलांशी क से जुळवून घ्यावे, अशा वेगवेगळ्या पातळ्यांवर असलेल्या गोंधळाबद्दल खुली चर्चा होते आहे.. समाजमाध्यमांचा वापर प्रत्येकाच्या हातातल्या स्मार्ट फोन्समध्ये असलेल्या समाजमाध्यमांच्या जाळ्यामध्ये याविषयी चर्चा घडवून आणली जात आहे. मध्यंतरी रुपी कौरने मासिक पाळीबद्दलचा टॅबू मोडीत काढण्यासाठी मासिक पाळीदरम्यान कपडय़ांवर लागणारे रक्ताचे डाग स्पष्टपणे दिसणारा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला होता. मासिक पाळीबद्दल लाज बाळगण्याचं काही कारण नाही, हे सांगण्याचा त्यामागे उद्देश होता. त्याची बरीच चर्चाही झाली होती. पाळीशी संबंधित व्हिडियो, जाहिराती या माध्यमांतून याविषयीच्या जागृतीचं काम चालूच असते. मात्र सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीमध्ये दाखवण्यात येणारं ‘निळं’ रक्त पुन्हा आपल्याला वास्तवापासून दूरच नेऊ पाहतं आहे की काय असा प्रश्न निर्माण होतो. बॉडीफॉर्म या परदेशी ब्रॅण्डनं याविषयी केलेली ‘ब्लड’ ही जाहिरात याविषयी जागरूकता निर्माण करणारी ठरली होती. अक्षयकुमारचा आगामी पॅडमॅन हा चित्रपट याच विषयावर आहे. तामिळनाडूमधील अरुणाचलम मुरुगनाथम या सामान्य माणसाने कमी खर्चात सॅनिटरी नॅपकिन बनवण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वीही करून दाखवला. त्याचीच गोष्ट पॅडमॅनमध्ये सांगण्यात येणार आहे. जमाना बदल रहा हैं डॉ. वैशाली देशमुख त्यांचं निरीक्षण नोंदवतात की, मासिक पाळी सुरु होण्याचं वय अलीकडं आलं आहे. तिचा फार बाऊ वाटण्याआधीच ती सुरू होते. पाळीबद्दलच्या दृष्टिकोनाबद्दल बोलायचं झालं, तर शहरांत आई किंवा शिक्षिकांकडून थोडीफार माहिती मिळालेली असते. काही वेळा इंटरनेटवरून माहिती मिळवलेली असते. त्यामुळे हल्लीच्या मुलींना पाळी म्हणजे अगदी सरप्राईज असं नसतं. पण शास्त्रीय माहिती अनेकदा नसते. अजूनही या विषयाबद्दल खुलेपणानं बोलणं होत नाही. पूर्वी पुरुषांसमोर हा विषय काढायचाच नाही, कुणाला हे कळवायचं नाही असे काही अलिखित नियम होते. पण हल्लीच्या अनेक मुली त्यांच्या वडिलांसोबत अगदी मोकळेपणाने वागतात. त्यांच्याशी पाळीबद्दलच्या गोष्टी शेअर करतात. भावांशी किंवा मित्रांशीही बोलतात. तेही त्यांना बऱ्यापैकी समजून घेतात. शालेय शिक्षणामुळेही अनेक बाबी कळतात. पण त्याविषयी मोकळेपणाने बोलण्याचं प्रमाण तरीही कमीच आहे. मी पेशंटची सेशन्स घेताना त्याविषयी सांगून मुलांचा दृष्टीकोन बदलायचा प्रयत्न करते. पण तरीही प्रत्येकाची मानसिकता वेगळी असू शकते. काहीजणी पाळीचा फार बाऊ करतात. तर काही तिला काहीच महत्त्व देत नाहीत. पाळीच्या काळातही अनेकजणींचे रोजचे व्यवहार नीट चालू असतात. ट्रेकिंग किंवा सहलींनाही अनेकजणी जातात. पण देवाधर्माच्या बाबतीतील बंधनं मात्र अजूनही बऱ्यापैकी पाळली जातात. अगदी आधुनिक आणि करिअरिस्टिक मुलींवरही तो पगडा दिसतो. कदाचित पुढची पिढी हे बंधन मानणार नाही. कारण आता आईच याबाबतीत मुलींवर कोहीही बंधन न लादता निर्णय घेण्यास सांगू लागली आहे. मुलींना याबाबतीत सक्षम करण्यासाठी, शिक्षित करण्यासाठी आधी पालकांचं समुपदेशन आवश्यक आहे. पण एकंदरित सध्याचा समाजाचा याकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक आणि आश्वासक वाटतो आहे. मासिक पाळीबद्दलच्या दृष्टीकोनातील बदल समाजात रुजून ते आचरणात येणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वानी एकत्र येऊन प्रयत्न करणे, गरजेचे आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने म्हणता येईल, ‘पिरिअडस् हैं, कोई पाप नहीं! ’ चला, बदल घडवू या.. शाळा-महाविद्यालयांमध्ये मासिक पाळीच्या प्रक्रि येविषयी शास्त्रीय माहिती दिली जाते. मात्र या माहितीपलिकडे जात समाजामध्ये नेमकी काय परिस्थिती आहे, याची माहिती पुस्तकातून मिळत नाही. तरुणाईला सद्यस्थिती ज्ञात व्हावी, याविषयी जनजागृती व्हावी म्हणून ‘म्यूज’ सारखी एनजीओ आता ‘मासिका महोत्सव’ साजरा करणार आहे. या एनजीओचा संस्थापक निशांत बंगेरासारखा तरूण आहे हे विशेष. निशांतच्या मते आजही भारतात मासिक पाळी हा विषय गुपचूप बोलण्याचा आहे. याविषयी उघडपणे फार कमी लोक बोलताना दिसतात. महाराष्ट्रातल्या अनेक स्त्रियांना अजून पुरेसे, स्वच्छ सॅनिटरी पॅड्स मिळत नाही. अनेकींच्या मनात या चार दिवसांबद्दल प्रचंड अंधश्रद्धा, गैरसमज आहेत. म्हणूनच याविषयी जनजागृती करण्यासाठी हा मासिक महोत्सव आहे. सॅनिटरी नॅपकिन्समधील केमिकल्समुळे ते शरीराला हानीकारक ठरू शकतात. त्यामुळेच आम्ही महिलांना मेनस्ट्रएशन कप्स, कापडाचे पॅड्स वापरण्याचं आवाहन करणार आहोत. महाराष्ट्र, गुजरात आणि उत्तराखंडमध्ये हा महोत्सव साजरा केला जाणार आहे. महाराष्ट्रात अनेक सांस्कृतिक कार्यक्रम, लघुपट स्पर्धा, सायकलसहली, पथनाटय़ होणार आहेत. गुजरातमध्ये ‘क्लॉथ पॅड’ वर्कशॉप तसेच मेनस्ट्रुएशन कप संदर्भातील सेशन घेण्यात येणार आहे. उत्तराखंडामध्ये मासिक पाळीसंदर्भात लघुपट दाखवून समाजामध्ये जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. सध्या आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. संभ्रम आणि गैरसमज पाळीविषयी जागृतीसाठी कितीही प्रयत्न होत असले तरीही अजूनही मुलींमध्ये याबाबतचा संभ्रम कायम आहेच. मासिक पाळीबद्दल उघडपणं बोलणं त्या टाळतात. सॅनिटरी नॅपकीनची सहज खरेदी होत नाही. मॉलमध्ये गेल्यावर इतर सामानाबरोबर न दिसेल असा ठेवून तो विकत घेतला जातो. त्याची नीटशी विल्हेवाट लावली जात नाही. त्याविषयी फारशी माहितीही नसते. तो वापरताना घ्यायची काळजी, तो किती वेळ वापरावा, याविषयीसुद्धा मुलींना माहिती नसते. देवाधर्माशी या गोष्टीचा संबंध जोडल्याने तर गोष्टी आणखीनच गुंतागुंतीच्या होतात. या चारपाच दिवसांत नेहमीप्रमाणे काम करावे की आराम करावा, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. त्याविषयी अनेक मतमतांतरे आढळतात. मुलांचा दृष्टिकोन अगदी आत्ताकुठे मुलांना या विषयाबद्दल माहिती होते आहे. नाहीतर जिथे मुलींनीच हा विषय कुजबुजीत बोलायचा होता, तिथे मुलांना त्याविषयी माहिती असणे, कठीणच होते. आजकाल मात्र अनेक मुलग्यांना या गोष्टीची योग्य ती वैज्ञानिक माहिती असते. किमान आपल्यासोबतच्या मुलीला दर महिन्याला हा शरीरधर्म येतो आणि त्याचा थोडय़ाफार प्रमाणात त्रासही होतो, होऊ शकतो याची कल्पना अनेकांना असते. एखादीची चिडचिड झाली की, पीएमएस का असा प्रश्न तिचे पुरुष सहकारी, मित्र सहज विचारू शकतात. कोणताही चुकीचा हेतू मनात न ठेवता. याच विषयावर काही मुलांशी विवा टीमने संवाद साधला. या दिवसांत मुलींच्या मूड्समध्ये बदल होणं, त्यांना त्रास होणं, साहजिक आहे. पण तरीही मी त्यांना तटस्थ राहायला, त्यांचा मूड चांगला राखायला मदत करेन. ओमकार सुर्वे बी.एस.सी. आयटी मासिक पाळीच्या दिवसांत काहीजणींना त्रास होतो तर काहींना होत नाही. माझी कुठली मैत्रीण, बहीण, माझ्यासोबतची कुठचीही स्त्री यांना जर अशा प्रकारे त्रास होत असेल तर मी तिला नक्कीच आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेन. - अंकुर पुजारी बी.एस.सी. आयटी मासिक पाळीदरम्यान बाजूला बसणे ही पद्धत आमच्या घरी नाही. अशाप्रकारे उगाचच 'पाळणे' वगैरे गोष्टी मला मान्य नाहीत. मला यासाठी काही करायला नक्कीच आवडेल. पण समाजमर्यादेच्या कक्षेबाहेर जाऊन ते करणं, आत्तातरी शक्य नाही. पण माझ्यासोबत असलेल्या कुठल्याही स्त्रीची मी या काळात नक्कीच काळजी घेईन. - परिमल जोशी, अभियांत्रिकी विद्यार्थी viva@expressindia.com