मासिक पाळी नियमित येणे, योग्य प्रमाणात रक्तस्राव होणे आणि एका विशिष्ट कालावधीनंतर रक्तस्राव थांबणे हे स्त्री आरोग्याचे गमक आहे. यात येणाऱ्या अडचणी व अडथळे आपण जाणून घेतले. पौगंडावस्थेत सुरू झालेली मासिक पाळी वयाच्या ३९ ते ५५ वर्षे या कालावधीत कधीही थांबू शकते. प्रथम ती अनियमित होते तर काही स्त्रियांना एक वर्षभर मासिक पाळी येत नाही. काही स्त्रियांना रजोनिवृत्तीपूर्व त्रास होतो. रजोनिवृत्ती येण्यापूर्वी वा आल्यानंतर छातीत धडधडणे, घामाने पूर्णपणे शरीर भिजून निघणे, कानामागे वा तळपाय, तळहातातून गरम वाफा येणे, योनीमार्गात कंड सुटणे, आद्र्रता कमी होणे, वारंवार मूत्रविर्सजनास जावे लागणे अशा प्रकारचे त्रास होऊ लागतात. हे त्रास सर्वानाच होतात असे नाही. काही स्त्रियांना मानसिक त्रास होतो. म्हणजेच चिडचिड होणे, किरकोळ गोष्टींवरून रागावणे, हतबल वाटणे, नराश्याने खचून जाणे, एखाद्या गोष्टीची भीती वाटणे, एकलकोंडेपणात आनंद मानणे, आपले जीवन व्यर्थ आहे अशी सतत जाणीव होणे, आपण कोणतेही शारीरिक वा मानसिक काम करू शकणार नाही असे सतत वाटणे अशा विविध तक्रारी सुरू होतात. अशी परिस्थिती गर्भाशयाची शस्त्रक्रिया करताना दोन्ही अंडकोश वयाच्या ४० ते ४५ वर्षांत काढले गेले असतील तरीही जाणवू शकते. विशेषत: वयाच्या ४० व्या वर्षांनंतर वा आधी हायपोथॉयरॉईड, मधुमेह, उच्च रक्तदाब यांचे निदान झाले असल्यास येणारी रजोनिवृत्ती त्यात विविध लक्षणांची भर टाकते. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मूत्राशयाचा दाह होणे हे जरी मधुमेहाशी संबंधित असले तरी काही स्त्रियांची मूत्रनलिका अंतस्रावाचा परिणाम म्हणून दबली जाते व मूत्र खूप वेळ मूत्राशयात राहिल्याने मूत्रदाह होतो. म्हणूनच रजोनिवृत्ती पूर्व होणारा त्रास हा प्रत्येक स्त्रीस वेगवेगळ्या प्रकारे जाणवतो तर काहींना जाणवतही नाही. संप्रेरक द्रव्याची विशेषत: इस्ट्रोजेनची कमतरता हे या त्रासामागील प्रमुख कारण. पण प्रत्येक त्रासावरील उपचार हा वेगवेगळा आहे तो स्त्री रुग्णाने स्त्रीरोगतज्ज्ञांशी संवाद करूनच घ्यायला हवा. यातील उपचारपद्धती निदानानंतर सुरू होते. गोळ्या, मलमे, छोटीशी शस्त्रक्रिया अशा विविध अंगांनी उपचारपद्धती सांगितली जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे योग्य आहार व योग्य व्यायाम तसेच लोहयुक्त, कॅल्शियम व जीवनसत्त्व ड-३ युक्त आहार व योग्य प्रमाणातील औषधे याकडे वयाच्या ४० व्या वर्षांपासूनच लक्ष दिल्यास आरोग्यदायी जीवन जगता येते. रजोनिवृत्तीपूर्वी येणारे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजे स्थूलता. यास अनेक कारणे असतातच पण शरीरातील इस्ट्रोजेनचे प्रमाण कमी झाल्याने आहारातील मेदाचे व शरीरातील मेदाचे गणित चुकत जाते. अतिस्थूलता शरीरास हानीकारकच. इस्ट्रोजेन या द्रव्याने स्त्रीच्या शरीरातील चरबीचे प्रमाण संतुलित राखले जाते म्हणूनच रजोनिवृत्तीची चाहूल लागताच हे प्रमाण कमी झाल्यास रक्तवाहिन्यांवर परिणाम होऊन हृदयाच्या रक्तपुरवठय़ास अडथळा येऊ शकतो. रक्तवाहिन्यांची लवचीकता व रक्ताभिसरण यांच्या संतुलनात रजोनिवृत्तीपूर्व काळात फरक पडण्यास सुरुवात होते. शरीरातील कॅल्शियम, जीवनसत्त्व ड ३ यांचे प्रमाणही कमी होत असल्याने कंबरदुखी, सांधेदुखी अचानक उद्भवते. अशा वेळेस योग्य प्रमाणात औषधे घेणे महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणे आहारातही बदल करून घेतल्यास आरोग्यास फायदा होईल. रजोनिवृत्तीपूर्व साधारणपणे ६० टक्के स्त्रियांना अतिरक्तस्रावाचा त्रास होतो. याची कारणे व उपचार यांची मीमांसा झालेलीच आहे. एकंदरीत प्रत्येक स्त्रीचे रजोनिवृत्ती येण्याचे वय भिन्न असते. रजोनिवृत्तीचा त्रास जरी वेगळा असला तरी त्यावर उपाय आहेत तसेच रजोनिवृत्तीपूर्व होणाऱ्या त्रासाची कल्पना असल्याने आपणास आहारात, मानसिकतेत बदल करून आरोग्याचे भान ठेवता येते. यात घाबरण्याचे कारण नाही. हा निसर्गनियम आहे. आपण सर्वानी समजून घेतल्यास रजोनिवृत्तीची भीती दूर पळून जाईल. आपलं आरोग्य आपल्याच हाती असतं हे विसरून चालणार नाही. मोजमाप आरोग्याचे : महिलांचे मानसिक आरोग्य * जगभरातील २५ टक्के महिलांना मानसिक आरोग्याचा त्रास असतो. * पाचपैकी दोन महिलांना मानसिक तणाव, चिंता, मूड बदलणे आदी मानसिक विकार असतात. * पाचपैकी एक पुरुष, तर बारापैकी एक महिला अतिमद्यपान करते. मानसिक त्रास हेच त्यांच्या मद्यसेवनाचे कारणे असते. * जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात २१.३ टक्के महिला मानसिक विकारग्रस्त आहेत, ८.२ महिला मद्यपानाच्या आहारी गेल्या आहेत. १.२ टक्के महिला personality disorder च्या शिकार आहेत. डॉ. रश्मी फडणवीस - rashmifadnavis46@gmail.com