सुरत-नागपूर महामार्गावर धुळ्याजवळ असलेल्या काटसर शिवारात झालेल्या भीषण अपघातात शुक्रवारी दुपारी १५ प्रवाशांना आपले प्राण गमवावे लागले. खासगी प्रवासी वाहतुकीच्या ट्रॅक्समधून निघालेल्या प्रवाशांवर अपघातामुळे जीव गमावण्याची वेळ आली. अपघातामध्ये तीन प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये ९ महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे. त्यापैकी तिघांची ओळख अद्याप पटलेली नाही. मृत्युमुखी पडलेले सर्वजण फागणे, मुकटी आणि अजंग गावातील रहिवासी आहेत.
काळी-पिवळी ट्रॅक्स आणि ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन त्यामध्ये ट्रॅक्सचा चेंदामेंदा झाला. या अपघातामुळे या महामार्गावरील वाहतुकही विस्कळीत झाली. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या साह्याने ट्रॅक्समधून प्रवाशांना बाहेर काढले. अनेक प्रवासी जागीच मृत्युमुखी पडले होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.