सावंतवाडी तालुक्यात पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. या योजना दुरुस्तीसाठी सुमारे ७५ लाख रुपयांचा आराखडा बनविला गेला आहे. माजगावात ११ तर तळवडे येथे पाच ठिकाणी पाणीटंचाई आराखडे बनविले आहेत.

पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या मर्जीतील तळवडे गावचे माजी सरपंच, माजी जिल्हा परिषद सदस्य व पालकमंत्र्याचे खासगी सचिव प्रकाश परब यांच्या गावात पाणी टंचाई जाणवत आहे. विकास संस्थेचे अध्यक्ष असून विकास संस्थेकडे बंधारा आहे. यंदा पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने त्यांनी केले नसल्याची टीका होत आहे.

तळवडे नदीवरील बंधाऱ्याचे पाण्याचे नियोजन प्रकाश परब यांनी योग्य पद्धतीने केले नसल्याने पाणीटंचाई जाणवत आहे. त्यामुळे सरपंच पंकज पेडणेकर यांनी आडेली लघुपाटबंधारे योजनेतील चार कोटी ७७ लाख लिटर पाणी १२ हजार ५०० रुपये जमा करून या बंधाऱ्याला सोडण्यास सांगितले. त्यामुळे प्रतिपालकमंत्री म्हणून प्रकाश परब यांनी गावात छबी निर्माण केली तरी गावाला पाणी पाजण्यास त्यांना अपयश आल्याची टीका करण्यात येत आहे.

सावंतवाडी तालुक्यात दहा नळपाणी योजना दुरुस्तीसाठी ३० लाख ५० हजार रुपयांचे सादर करण्यात आले आहे. त्यात आरोस देऊळवाडी, असनिये कणेवाडी, निगुडे देऊळवाडी, बांदा मोर्येवाडी, मळेवाड धनगरवाडी, शेर्ले देऊळवाडी, सातार्डा देऊळवाडी, सोनुर्ली गावठणवाडी, शिरंशिगे परबवाडी व न्हावेली नागझरवाडी नळपाणी योजना पाणीटंचाई योजनेतून घेण्यात येणार आहेत.

सावंतवाडी शहरालगत असणाऱ्या माजगावात पाच ठिकाणी म्हणजे श्रेयशकॉलनी, कासारवाडा, कुंभारवाडा, म्हालरकरवाडा, भटवाडी या पाच वाडय़ावर विंधन विहीरी दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयाची गरज आहे.

पाणी टंचाई आराखडय़ात नवीन विंधन विहिरी सुचविण्यात आल्या आहेत. त्यात आरोंदा आगराळवाडी, तळवडे बांदेगाव, मडुरा रेडकरवाडी, डिंगणे धनगरवाडी, निगुडे नवीन देऊळवाडी, तळवडे नागडेवाडी, तळवडे गिरिस्तेवाडी, दाणोली गावठणवाडी, आरोंदा भटवावणी, आंबोली कामतवाडी, आंबोली मुळवंद सरमळकरवाडी, ओटवणे शेरवाळवाडी, ओटवणे धनगरवाडी, ओटवणे मांडवफातरवाडी, इन्सुली माडभाकर, कारिवडे पेडवेवाडी, कारिवडे भोगटेनगर, कुणकेरी वाघबीळवाडी, कुणकेरी लिंगाचीवाडी, कुणकेरी पळसदवाडी, कुणकेरी भवानीगर, केसरी वरचीवाडी, केसरी फणसवाडी, कोनशी दाभीळ, डेगवे मोयझरवाडी, तळवडे परबवाडी, तळवणे आंबा फणसवाडी, देवसू कुंभेश्वरवाडी, निरवडे गावठणवाडी, निरवडे भंडारवाडी, नेमळे गावडेवाडी, न्हावेली धाऊसकरवाडी, न्हावेली चौकेकरवाडी, पाडलोस सातवीणमळा, बांदा देऊळवाडी, मळगाव रस्तावाडी, मडुरा बाबरवाडी, माजगाव तांबळगोठण, माजगाव दळवीवाडी, माजगाव ख्रिश्चनवाडी, माजगाव कासारवाडा (मुस्लीमवाडी), माडखोल वरकोंडवाडी, मळेवाड कुंभारवाडी, रोणपाल देऊळवाडी, वाफोली आडावाडी, वेल्ये वरची गावकरवाडी, शिरशिंगे बिरवाडी, सांगेली जायपीवाडी सोसायटीजवळ, सांगेली घोलेवाडी, सोनुर्ली पाक्याचीवाडी, दांडेली वरचीवाडी, सातोळी दाणोली ख्रिश्चनवाडी, कास हरिजनवाडी अशा ५३ वाडय़ांवर विंधन विहिरीसाठी ३९ लाख ७५ हजार रुपयांचा आराखडा बनविण्यात आला आहे.

याशिवाय तालुक्यातील दहा वाडय़ावरील विहिरी खोल करून गाळ काढण्यासाठी आंबेगाव देऊळवाडी, कलंबिस्त रायवाडी, चराठे हरिजनवाडी, चौकुळ म्हाराटीवाडी, सोनुर्ली पाक्याचीवाडी, बांदा पानवळ, बांदा सटमट, कुडतरकर टेंब धनगरवाडी, माजगाव हटसावंतवाडा, माजगाव म्हालटकरवाडी या ठिकाणी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना सुचविल्या आहेत.

दरवर्षी कडक उन्हाळ्याच्या काळात पाणीटंचाई आराखडय़ासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येतात. मात्र जमिनीत ‘पाणी अडवा व जिरवा’ कार्यक्रम घेण्यासाठी शासन सक्तीचा कार्यक्रम हाती घेत नाही. भूगर्भातील पाणी पातळी चिंताजनक असताना विंधन विहिरीच्या नावाने भूगर्भात खोदाई करण्यात येते. त्यामुळे पाण्याचे स्रोतदेखील विभागले जातात असे बोलले जाते. नळपाणी योजनांच्या किंवा धरण प्रकल्प असणाऱ्या गावातदेखील पाणीटंचाई जाणवते. हा प्रकार धक्कादायक मानला जातो.