एस.एस. राजामौली यांच्या 'बाहुबली' या चित्रपटातील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करुन आहे. या चित्रपटातील मुख्य कलाकारांसोबतच सहाय्यक अभिनेत्यांच्या भूमिकांनाही प्रेक्षकांची पसंती मिळाली. विक्रमी कमाई करणाऱ्या या चित्रपटातील 'देवसेना' तुम्हाला आठवतेय का? अर्थात हा काही प्रश्न झाला का.., असंच तुम्ही म्हणाल. पण, 'देवसेना' म्हणून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी इतक्या सहजासहजी प्रकाशझोतात आली नाहीये. राजामौलींच्या या भव्य चित्रपटामध्ये झळकलेली अभिनेत्री अनुष्का शेट्टी तिच्या पहिल्यावहिल्या ऑडिशनमध्येच अपयशी ठरली होती. पण, त्यानंतर मात्र तिनं मागे वळूनही पाहिलं नाही. सध्या अनुष्काच्या जुन्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, ही खरोखरच अनुष्का आहे का, असाच प्रश्न पडत आहे. अनुष्कासोबत घडलेली ही घटना, कारकिर्दीच्या पहिल्याच पायरीवर आलेलं अपयश पाहता कधी काळी शाळेत शिकलेला सुविचार, 'अपयश हीच यशाची पहिली पायरी असते.' यावर आपलाही विश्वास बसतो. सध्याच्या घडीला अनुष्का दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री असली तरीही सुरुवातीच्या काळात ती योगा प्रशिक्षक म्हणून काम करत होती. २००५ मध्ये 'सुपर' या चित्रपटाच्या माध्यमातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. पण, तिला खऱ्या अर्थाने ओळख मिळवून दिली ती म्हणजे २००६ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'विक्रमार्कुडु' या चित्रपटाने. या चित्रपटाचं दिग्दर्शनही एस.एस. राजामौलींनीच केलं होतं. त्यामुळे एक प्रकारे अनुष्काच्या यशामध्ये राजामौलींचाही महत्त्वाचा वाटा आहे यात शंकाच नाही.