गतकाळातील बहुचर्चित आणि प्रसिध्द चित्रपट मि. इंडियाने गेल्या २७ मे ला ३० वर्षे पूर्ण केली. बोनी कपूर यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटात अनिल कपूर आणि श्रीदेवी ही मुख्य जोडी होती. अलीकडच्या काळात साय-फाय आणि सुपर हिरो प्रकारातील बॉलिवूडपटांची रेलचेल दिसत असली, तरी मि. इंडिया हा या प्रकारातील पहिला बॉलिवूडपट असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. काळाच्या पुढे असलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनानंतर बऱ्याच काळापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले. आजदेखील प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाविषयी तेच आकर्षण पाहायला मिळते. मि. इंडिया चित्रपट आजही प्रेक्षकांना तितकाच आवडतो हे पाहून खूप आनंद आणि अभिमान वाटतो. त्यावेळी कॅमेऱ्यामागील मी सर्वात तरूण सदस्य होतो. आता 'मॉम' या चित्रपटाच्या वेळी सर्वात वयस्कर सदस्य आहे. मि. इंडिया चित्रपटासाठी आम्ही अभिनेत्याच्या स्टारडमवर अवलंबून नव्हतो. केवळ चित्रपटाची जादूच पुरेशी होती. चित्रपटातील हाणामारीची दृश्ये, स्टंट आणि तोडफोडीची दृश्ये ही प्रत्यक्ष-वेळी सेटवर करण्यात आलेले चालू स्थितीतील दिग्दर्शित आणि स्पेशल इफेक्टसचा वापर करून साकारण्यात आली होती. निर्मिती पश्चात प्रक्रिया करून ती साकारण्यात आली नव्हती, अशी माहिती चित्रपटाचे निर्माता बोनी कपूर यांनी दिली. बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर 'मॉम' चित्रपटाद्वारे पुन्हा एकदा एकत्र आले आहेत. चित्रपटात नवाझुद्दीन सिद्दीकी आणि अक्षय खन्ना यांच्यादेखील भूमिका आहेत. 'मॉम' हा श्रीदेवीचा ३०० वा चित्रपट असून तिच्या अभिनय कारकिर्दीला यावर्षी ५० वर्षे पूर्ण होत आहेत. रवि उदयवार यांचे दिग्दर्शन आणि ए. आर. रहेमान यांचे संगीत असलेला हा चित्रपट तमिळ, तेलगु, मल्याळम आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जुलै महिन्याच्या ७ तारखेला 'मॉम' प्रेक्षकांना भेटायला येत आहे.