तिकीट खिडक्यांसमोरील लांबच लांब रांगांपासून प्रवाशांची सुटका करण्यासाठी रेल्वेने प्रवाशांच्या हाती स्मार्टकार्ड देत एटीव्हीएमचा पर्याय दिला असला, तरी एटीव्हीएमची किचकट प्रक्रिया प्रवाशांसाठी वेळखाऊ ठरते इतकेच नव्हे तर काही स्थानकांत तर एटीव्हीएम यंत्रांसमोरही तितक्याच मोठय़ा रांगा लागत असल्याचे समोर आले आहे. ही अडचण सोडवण्यासाठी येत्या काही महिन्यांत तीन सोप्या पायऱ्यांमध्ये तिकीट देणारे ‘हॉट की एटीव्हीएम’ यंत्र विकसित केले जात आहे. हे यंत्र तिकिटांच्या टप्प्यांनुसार राहणार असून प्रत्येक टप्प्याअंतर्गत येणाऱ्या स्थानकांसाठी एकच बटण असेल. त्यामुळे प्रवाशांना केवळ एक बटण दाबताच तिकीट मिळेल.
सध्या एटीव्हीएम यंत्रांवर कार्ड ठेवल्यानंतर ज्या स्थानकाकडे जायचे आहे त्याच्या नावावर नकाशात क्लिक करावे लागते. त्यानंतर तिकिटासाठी ‘एकेरी की परतीचे’ हा पर्याय निवडावा लागतो. मग प्रथम की द्वितीय वर्ग हा पर्याय निवडावा लागतो. मग तिकीट मिळते. अनेक प्रवाशांना ही सर्व प्रक्रिया खूप किचकट वाटते. ती नव्या यंत्रामुळे टळणार आहे.
या नव्या यंत्रात स्मार्टकार्ड ठेवा, गंतव्य स्थानकासमोरील बटण दाबा आणि तिकीट घ्या, या तीन पायऱ्यांत तिकीट मिळणार आहे. त्यासाठी उपनगरीय तिकीट दर टप्पे विचारात घेतले आहेत. उदाहरणार्थ मुंबई ते वाशी या टप्प्यात चेंबूर, मानखुर्द आणि वाशी या स्थानकांच्या तिकिट दर १५ रुपये हाच आहे. त्यामुळे १५ रुपयांच्या टप्प्याच्या बटणावर क्लिक करताच थेट  वाशीपर्यंतचे तिकीट मिळेल.

या यंत्रांमुळे प्रवाशांचा वेळ वाचेल. ही यंत्रे आधीच्या एटीव्हीएमपेक्षा कमी जागा व्यापतील तसेच ती स्वस्तही असतील. सध्या एका एटीव्हीएम यंत्रासाठी सव्वा लाख रुपये मोजावे लागतात. मात्र हे नवे यंत्र त्यापेक्षा निम्म्या किमतीत उपलब्ध होईल.
– डॉ. आलोक बडकुल, विभागीय वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक