प्रवेश शुल्क भरूनही विद्यार्थ्यांना प्रवेश न दिल्याने वादात अडकलेल्या बोरिवली येथील नालंदा विधी महाविद्यालयाचे प्रकरण आता मुंबई विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे आले आहे. याबाबत आलेल्या विद्यार्थ्यांच्या तक्रारींची दखल घेऊन निवारण समिती २७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्याची शक्यता आहे.
बोरिवली येथील शाहू शिक्षण संस्थेच्या नालंदा विधी महाविद्यालयाच्या संचालकांविरोधात मंगळवारी विद्यार्थ्यांनी निदर्शने केली होती. या महाविद्यालयात ५८ विद्यार्थ्यांकडून प्रवेशासाठी २२ ते ५० हजार रूपये घेऊनही त्यांना प्रवेश दिला नाही.
तसेच या पैशांची कोणती पावतीही महाविद्यालयाकडून देण्यात आली नव्हती. यामुळे या प्रकरणी विद्यार्थ्यांचा तसेच पालकांचा रोष खूपच वाढत गेला. याबाबत काही विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीकडे धाव घेतली असून याबाबत तातडीने लक्ष घालण्याची मागणी करण्यात आली आहे.  

खुलासा मागवला
या तक्रारींची दखल घेऊन महाविद्यालय प्रशासनाकडून खुलासा मागविण्यात आल्याचे तक्रार निवारण समितीचे सदस्य आणि विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी लीलाधर बन्सोड यांनी स्पष्ट केले. २७ ऑगस्टला तक्रार निवारण समितीची बैठक होणार असून त्या आधी महाविद्यालयाकडून माहिती येईल. त्यानंतर या संदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले.