पुढील वर्षीच्या साहित्य संमेलनासाठी आत्तापर्यंत फक्त एकच आवतण अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडे आले आहे. हे निमंत्रण पिंपरी-चिंचवड येथील संस्थेकडून आले आहे. साहित्य संमेलनात समारोपाच्या दिवशी पुढील संमेलनासाठी कोणाकडून निमंत्रणे आली आहेत, त्याची घोषणा केली जाते.
चिपळूण साहित्य संमेलनातही समारोपाच्या दिवशी ती करण्यात आली. आत्तापर्यंतचा अनुभव असा की दोन ते चार संस्थांकडून ही आमंत्रणे येतात. येथे मात्र अद्याप तरी फक्त एकाच संस्थेकडून आमंत्रण आले आहे. साहित्य महामंडळाकडे ज्या ज्या संस्थांची आमंत्रणे येतात, त्या सर्व ठिकाणी महामंडळाच्या संमेलन स्थळ निश्चित समितीचे सदस्य भेट देऊन पाहणी करतात आणि त्यानंतर संमेलन स्थळ निश्चित केले जाते. पुढील साहित्य संमेलनासाठी येत्या ३१ मार्च २०१३ पर्यंत आलेल्या निमंत्रणांचा विचार केला जाणार आहे.