केवळ मराठीच शाळा चालवू, या जिद्दीने ४० वर्षांपूर्वी ‘अस्मिता’ संस्थेने मुंबईच्या जोगेश्वरीसारख्या मध्यवर्ती भागात शाळा सुरू केली. आज ‘रामगोपाल केडिया प्राथमिक विद्यालय’ आणि ‘जमनाधर अग्रवाल माध्यमिक विद्यालय’ या नावांनी ही मराठी शाळा आज इंग्रजी शाळेप्रमाणेच दर्जा उंचावून आहे. तुम्ही एक पाऊल पुढे उचला, आम्ही दहा पावले उचलू, या विचाराने प्रेरित होऊन जोगेश्वरीत सामाजिक कार्याचा पाया रोवणाऱ्या अस्मिता संस्थेने १९७६ साली मराठी शाळा सुरू केली. तेव्हापासून शिक्षण सेवेचा वारसा संस्था अविरतपणे चालवीत आहे. आजूबाजूच्या वस्तीतील रिक्षाचालक, फेरीवाले अशा निम्नउत्पन्न वर्गातील मुले हे शाळेचे विद्यार्थी. आजूबाजूच्या इंग्रजी शाळांच्या शैक्षणिक दर्जाशी स्पर्धा करत आपल्या मराठी शाळेला नावारूपाला आणण्याची येथील शिक्षकांची धडपड आहे. म्हणून होता होईल त्या अद्ययावत यंत्रणा शाळा अध्यापनाकरिता उपलब्ध करून देते. येथील प्रत्येक वर्गात प्रोजेक्टर, स्मार्टबोर्डच्या साहाय्याने शिकविले जाते. तेथील मुलांना शिक्षणाची गोडी लागावी यासाठी शिक्षकांची धडपड असते. शिक्षकांची बांधिलकी इतकी की, बरेचसे शिक्षक येथील आरे कॉलनीतील आदिवासी पाडय़ावर शिकवणीसाठी जातात. शाळेला ‘नॅबेट’ या राष्ट्रीय मानक संस्थेचा पुरस्कार लाभला आहे. इंग्रजी भाषेशी मैत्री आपल्या पाल्याने इंग्रजी भाषेत प्रावीण्य मिळवावे असे प्रत्येक पालकाला वाटते. यासाठी शाळेत पाचवीपासूनच विद्यार्थ्यांना पाच वर्षांचा संगणकीकृत अभ्यासक्रम टप्प्याटप्प्याने शिकवला जातो. यासाठी ‘एल २१’ या नावाच्या एका स्वयंशिक्षित उपक्रमांतर्गत विद्यार्थी इंग्रजी भाषा आत्मसात करतात. यात विद्यार्थ्यांना पाच वर्षे शाळेत दहावीपर्यंत पाच पायऱ्यांमध्ये भाषा साधी सोपी करून शिकवली जाते. त्याचसोबत विद्यार्थी संगणकसाक्षर व्हावा यासाठी त्याला अत्यल्प शुल्कात प्रशिक्षण दिले जाते. वर्ग आमुचा वेगळा लहान वयातच मुलांच्या शिकण्याची गती लक्षात घेऊन शिकविले जाते. विशेष मुलांच्या गरजा यामुळे आपोआपच ध्यानात येतात. त्यांना अभ्यासात मार्गदर्शन आणि कल लक्षात घेऊन वेळोवेळी मार्गदर्शन केले जाते. शाळेने या मुलांकरिता विशेष शिक्षकांची नेमणूक केली आहे. काही वेळा मुलांना वर्गात इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने शिकण्यात अडचणी येतात. अशा वेळी त्यांना सोप्या पद्धती वापरून शिकण्यास मदत केली जाते. याशिवाय खेळण्यासाठी विशेष खेळणी उपलब्ध आहेत. या विद्यार्थ्यांच्या प्रगतीबाबत पालकांशी वेळोवेळी चर्चा केली जाते. त्यामुळे लहान वयातच त्यांच्या समस्येवर उपाय करता येतो. कौशल्य विकास शालेय वयातच विविध कौशल्यांची गोडी विद्यार्थ्यांना लागावी यासाठी प्रशिक्षण दिले जाते. यासाठी शिवणयंत्र, लाकडी वस्तू बनवण्याची कला, बागकाम, पाककला, इलेक्ट्रिशन, प्लंबिंग, ज्वेलरी डिझायनिंग यांसारख्या कौशल्यआधारित गोष्टींचे प्रशिक्षण शाळा देते. यामुळे दहावीनंतर नोकरी व व्यवसाय करूनही विद्यार्थी पुढील शिक्षण घेऊ शकतात. यासाठी मुलांच्या त्या त्या ठिकाणी क्षेत्रभेटी घडवून आणल्या जातात. मुले त्या त्या व्यवसायांतील अनुभवी व्यक्तींशी संवाद साधतात. यामुळे विद्यार्थ्यांचे मनोबल वाढते. यामुळे शाळेचे अनेक माजी विद्यार्थी पुढे आयटीआयमध्ये शिकून नंतर संस्थेतच कामासाठी रु जू झाले आहेत, असे संस्थेचे पदाधिकारी संजय परुळेकर यांनी सांगितले. अमृतपुत्र आणि अमृतकन्या शाळेत दिव्यांग मुलेसुद्धा सामान्य मुलांसोबत शिक्षण घेतात. त्यांनाही कला-कौशल्यआधारित शिक्षण दिले जाते. त्यांनी स्वबळावर उभे राहावे हा त्यामागचा उद्देश. या मुलांना योगिता तांबे या वाद्यवृंद आणि गायन शिकवितात. स्वत: दृष्टिहीन असूनही पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना गायन-वादनाचे धडे त्या देत आहेत. स्वच्छता सर्व काही शाळेची डोळ्यात भरणारी स्वच्छता हे आणखी एक वैशिष्टय़. शाळेचा परिसरच नव्हे तर जिने, बाक, कपाटे, भिंती अशा प्रत्येक गोष्टी लखलखीत दिसतील याकडे कटाक्ष असतो. प्रत्येक शुक्रवारी संपूर्ण शाळा सर्व शिक्षक आणि विद्यार्थी मिळून स्वच्छ करतात. या शाळेला स्वच्छतेसाठी खुद्द राज्यपालांनी शाबासकी दिली आहे. ‘आमची शाळा स्वच्छतेबाबत अत्यंत दक्ष असते. शाळेत स्वच्छता करताना आम्हाला कसलाही कमीपणा वाटत नाही. आमचे संस्थाचालक, शिक्षक आणि मी स्वत: शाळेत स्वच्छतेची कामे करतो,’ असे शाळेचे मुख्याध्यापक श्रवण पाटील सांगतात. गांडूळ खतनिर्मिती शाळेतील आवारात शिक्षक आणि मुलांच्या मदतीने गांडूळ खत निर्मितीचा प्रक ल्प राबविला जातो. यासाठी शाळेचे प्रक्षिशित शिपाई मदत करतात. यातून तयार झालेले खत शाळेच्या आवारातील झाडांसाठी वापरले जाते. काही अंशी त्याची विक्री केली जाते. याचसोबत औषधनिर्मितीसाठी शिक्षकांच्या मदतीने मुलांना प्रयोगशाळेत शिक्षण दिले जाते. या सर्व उपक्रमांत मुले हिरिरीने सहभाग घेतात. करिअर मार्गदर्शन शाळेत मुलांना भविष्यातील लेखन, जाहिरात, छायाचित्रण, मुद्रितकला, हवाईसुंदरी, शिवणकला, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील संधी, डिप्लोमा कोर्सेस यांसारख्या विविध करिअरविषयक संधींबाबतही सविस्तर माहिती दिली जाते. आठवी ते दहावीत शिकत असलेल्या विद्यार्थाना शाळेच्या माजी विद्यार्थ्यांक डून माहिती दिली जाते. त्याचसोबत ज्यांना भविष्यात काही उत्तुंग करण्याची इच्छा आहे, अशा होतकरू विद्यार्थाना आर्थिक पाठबळही दिले जाते. विद्यार्थ्यांच्या केवळ शैक्षणिकच नव्हे तर शारीरिक, भावनिक, मानसिक अशा विविध प्रकारच्या विकासातून त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याचा प्रयत्न शाळा या विविध उपक्रमांमधून सातत्याने करते आहे. शाळेच्या या भूमिकेला अनुसरून झोकून देऊन काम करणारे शिक्षक शाळेला लाभल्यानेच मराठी ‘अस्मिते’चा हा झेंडा मुंबईच्या उपनगरात डौलाने फडकतो आहे. - संकलन - रेश्मा शिवडेकर reshma.murkar@expressindia.com तेजस परब