आपल्या मेंदूचा मतदानाच्या निर्णयाशी फार जवळचा संबंध असतो. मतदान सध्या सुरू आहे त्यामुळे मतदानाच्या वेळी मेंदूत नेमक्या काय घडामोडी होतात हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. मतदान ही तर्कसंगत निर्णयाची प्रक्रिया आहे. कॅलिफोíनया विद्यापीठातील  प्रा. वॉल्टर फ्रीमन, एमोरी विद्यापीठातील ड्यू वेस्टन यांनी मतदानाच्या निर्णयाची प्रक्रिया कशी घडते याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. मेंदूमध्ये तर्क संगती, वास्तववादी, विवेकी, सकारात्मक विचार करणारे भाग डाव्या बाजूला; भावनेवर काम व अंत:प्रेरणेने काम करणारे भाग हे उजव्या बाजूला असतात. मतदानात राजकीय पक्ष आपल्या मनाशी खेळ मांडत असतात. त्याच्या विविध टप्प्यांचा उलगडा आपण येथे केवळ आपल्याकडची नावे घेऊन समजावून घेणार आहोत. दुर्दैवाने काही भारतीय लोक मेंदूतील भावनाकेंद्राने दिलेला कौल व तर्काशी निगडित भागाने दिलेला कौल यात भावनिक कौल मानतात आणि तिथेच फसगत होते. मतदान ही खरेतर भावनेच्या आधारावर निर्णय घेण्याची गोष्ट नाही, कारण जगाचे राजकारण व आंतरराष्ट्रीय स्थिती बघितली तर विवेकबुद्धी जो कौल देईल तो मान्य करायची सवय आता लावायला हवी. लोक उमेदवाराकडे विकासाचा आराखडा मागत नाहीत, भूलथापांना बळी पडतात.
मनाचा खेळ
जर काँग्रेसची प्रतिक्रिया ‘मं नही, हम’ आहे तर राहुल गांधी यांचे लोकशाहीचे रूप त्यांनीच मागे सांगितलेल्या मधमाशांच्या पोळ्याप्रमाणे आहे व ते सकारात्मक आहे. त्यामुळे मेंदूच्या ऑरबिटो फ्रंटल भागात क्रियाशीलता वाढू शकते व त्यातून आपल्याला सहकार्याने मार्गक्रमण करायचे आहे असा संदेश मिळतो.
तर्कसंगतता
 जेव्हा तुम्ही ऐकता, की मोदींना मते द्या तेव्हा मतांसाठी आवाहन असते, आपल्या मनात ते ठसते. हे खरे असले तरी तुमचा निर्णय त्याआधीच झालेला असतो कारण त्याआधी बरेच काही तुमच्या कानावर पडलेले असते. पण एक मात्र खरे की, तुम्ही मोदींना मत द्यायचे किंवा नाही असे ठरवले असेल तर तुमच्या अहंगंडाशी ते त्यांच्या प्रतिस्पर्धी नेत्याचे आवाहन ताडून पाहिले जाते; मगच निर्णय घेतला जातो.
लाट
निवडणुकीच्या सभांना खूप मोठी गर्दी होत आहे; मोदी आणि राज ठाकरे यांच्या सभा खास ऐकण्यासाठी लोक जातात. बोधन विषयक मेंदूतज्ज्ञांच्या मते गर्दी कधीच मतदानात परिवíतत होत नाही, त्यांनी आधीच निर्णय ठरवलेला असतो. लाट आहे की नाही हा मुद्दा अलाहिदा, पण ती मोदींच्या बाजूने आहे की, काँग्रेसच्या विरोधात आहे असा विचार करायला हरकत नाही. पण मोदींचा प्रचार इतका आक्रमक आहे की, त्यात लोक वाहून गेले आहेत असे राजकीय तज्ज्ञ सांगतात.
निकटता
काहीवेळा मतदार व्यक्तिगत संबंधांना महत्त्व देतात. त्यातून व्यक्तिगत फायदे किती मिळू शकतील हे पाहतात. खेडेगावात असे प्रकार बरेच चालतात. एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री चित्रपटातून लोकांच्या परिचयाची असते, त्यामुळे केवळ ती व्यक्ती माहिती आहे म्हणून मतदान केले जाते.
जाहिरातबाजी
आता पूर्वीसारखा ताई, माई अक्का, छगन कमळ बघ अशा पद्धतीचा रिक्षातून प्रचार होत  नाही पण जाहिरातबाजी होते. आता जाहिरातींची जागा पेड न्यूजने घेतली आहे. प्रत्येक उमेदवाराच्या किंवा पक्षांच्या जाहिराती तुम्ही बघता, पण त्यातली कुठली भावते याचा प्रतिसाद मेंदू देत असतो. पण त्यात हाही बरा वाटतो आणि तोही बरा वाटतो असे म्हणता येत नाही. प्रश्नाचे एकच तर्कसंगत उत्तर द्यावे लागते.
अनिर्णीत
अनेक मतदार शेवटपर्यंत मत बनवू शकत नाहीत, कदाचित त्यांना हवा तसा उमेदवार समोर दिसत नसतो. अशी कुंपणावरची मते अखेरच्या क्षणी फिरतात, त्यांचे प्रमाण फार थोडे असते. त्यात तत्कालीन बाबींचा निर्णयावर प्रभाव पडून जातो.