गो. पु. देशपांडे यांच्या हस्ते विनोद दोशी विद्यावृत्ती प्रदान
नव्या कल्पना वापरून नव्या पिढीच्या नाटककार आणि कलाकारांनी स्वतचा प्रेक्षकवर्ग निर्माण केला आहे. रंगभूमीसाठी यापेक्षा वेगळे काय करणार? शेवटी रमणीयार्थम प्रतिपादन हेच नाटकाचे मुख्य कर्तव्य असते. हे रमणीय प्रसंगी कडवट असू शकते हे नव्या पिढीच्या मुलांनी दाखवून दिले आहे याचा आनंद वाटतो, अशी भावना ज्येष्ठ नाटककार गो. पु. देशपांडे यांनी मंगळवारी व्यक्त केली.
साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे गो. पु. देशपांडे यांच्या हस्ते गगन रिआर, ओम भूतकर, पर्ण पेठे, श्रुती व्यास आणि उमेश जगताप या युवा रंगकर्मीना
विनोद दोशी विद्यावृत्ती प्रदान करण्यात आली. प्रतिष्ठानचे व्यवस्थापकीय विश्वस्त अशोक कुलकर्णी, सुनील शानभाग आणि प्रसिद्ध नाटककार सतीश आळेकर याप्रसंगी उपस्थित होते.
गो. पु. देशपांडे म्हणाले, मराठी नाटक, नाटककार आणि कलाकार हे कालबाह्य़ होऊ शकतात. आम्हाला कालबाह्य़ करणाऱ्या युवा पिढीला किमान शेक-हँड तरी करावा या हेतूने मी आलो आहे. मराठीमध्ये दोन प्रकारची नाटके होतात. पांढरे केस असलेले लोक जातात ती नाटके आणि काळे केस असलेले लोक जातात ती नाटके. युवा पिढीने आमच्यासारख्या पांढऱ्या केसवाल्यांना दूर केले तेच बरे केले.
सतीश आळेकर म्हणाले, आमच्या काळामध्ये नोकरी सहजगत्या उपलब्ध होती. त्यामुळे नोकरी आणि नाटकाचा ध्यास या दोन्ही गोष्टी करणे शक्य होते. पण, १९९१ नंतरच्या काळात नोकरी मिळणे अवघड झाले आहे. त्यामुळे युवा कलाकारांना पूर्णवेळ या क्षेत्रात असावे लागते. प्रसंगी पैसे मिळतीलच असे नाही. अशा संक्रमणावस्थेत असलेल्या कलाकारांना प्रोत्साहनपर विद्यावृत्ती मिळणे महत्त्वाचे आहे.