ऐतिहासिक महत्त्वाच्या असलेल्या पेमगिरी येथील नैसर्गिक ठेवा ठरलेला महाकाय वटवृक्ष संकटात सापडला आहे. जमिनीत रुजू पाहणाऱ्या वडाच्या नवीन पारंब्या काही समाजकंटक मध्येच तोडून टाकत आहेत. त्यामुळे वटवृक्षाची वाढ खुंटली आहे. वन विभागाने वेळीच लक्ष दिले नाहीतर हा ऐतिहासिक ठेवा इतिहासजमा होण्याची चिन्हे आहेत.तालुक्यातील पेमगिरी हे ऐतिहासिकदृष्टय़ा महत्त्वाचे गाव आहे. डोंगरदऱ्यांतून वाहणारे निर्झर आणि घनदाट वनराईमुळे गावाच्या सौंदर्यात अधिकच भर पडली आहे. ऐतिहासिक पेमगिरी किल्ला आणि महाकाय वटवृक्ष हा पेमगिरीकरांचा अमूल्य ठेवा आहे. भारतातील सर्वात मोठे वडाचे झाड कोलकात्याला आहे. त्यानंतर पेमगिरीच्या वटवृक्षाचा क्रमांक लागतो. सुमारे अडीच ते तीन एकरांच्या परिसरात या झाडाचा विस्तार झाला आहे. वाढलेल्या झाडाच्या पारंब्या जमिनीला टेकल्या, की त्यालाच मुळे फुटून नवीन झाड जन्म घेते. अशा शेकडो पारंब्या जमिनीत रुजून हा विशाल वटवृक्ष वर्षांनुवर्षे दिमाखात उभा आहे. वटवृक्षाबाबत गावात वेगवेगळय़ा ऐतिहासिक व पौराणिक कथाही सांगितल्या जातात. त्या कथांतूनही वटवृक्षाचे जतन करणे आवश्यक असल्याचे सूचित केलेले आहे. याशिवाय झाडाला इजा पोहोचविणाऱ्यांना संकटांचा सामना करावा लागेल असाही मथितार्थ काही लोककथांतून निघतो. त्यातून या झाडाचे जतन महत्त्वाचे असल्याचे आपल्या पूर्वजांनाही कळल्याचे अधोरेखित होते. भूगोल आणि जैवविविधतेचा अभ्यास करणाऱ्यांसाठीही हे महत्त्वपूर्ण ठिकाण आहे. याशिवाय अनेक पर्यटक, शाळांच्या सहली हे झाड पाहण्यासाठी येतात. यापूर्वीही विस्तारत असलेले हे झाड विविधप्रकारे छाटण्याचे उद्योग केले गेले आहे. मध्यंतरी त्याला बऱ्यापैकी आळा बसला होता. अलीकडे पुन्हा असे प्रकार झाल्याचे समोर येत आहे. लोंबलेल्या पारंब्या जमिनीत टेकून नवीन पारंब्या फुटू पाहात असतानाच मधोमध त्या छाटण्यात आल्या आहेत. या समाजकंटकांना रोखणे महत्त्वाचे आहे. याशिवाय जुनाट झालेल्या काही खोडांमध्ये विविध कीटकांनी आपली घरे बनवली आहे. त्यामुळे ती खोडे कमकुवत झाली आहेत. त्यावरही शास्त्रीय दृष्टीने उपाय करणे आवश्यक झाले आहे. पर्यटकांकडून बेजबाबदारपणे टाकला जाणारा प्लॅस्टिकचा व इतर कचरा हीदेखील नवी समस्या होऊन बसली आहे. यावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. अन्यथा हा अमूल्य ठेवा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत.