विजयादशमीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी या सर्वानी हाती प्रतीकात्मक शस्त्रे घेऊन प्रतीकात्मक रावणदहन केल्याचे पाहून त्यांच्या त्यांच्या चाहत्यांना प्रतीकात्मक परंपरा जतन झाल्याचा आनंदच झाला असेल. म्हणाल तर तशी ही कृती वेशभूषा स्पर्धेतील गमतीसारखी. तेव्हा त्यास खरवडून काही वेगळे अर्थ चिकटविण्याचा सेक्युलरी नतद्रष्टपणा करण्याचे काहीही कारण नाही, असे अनेकांस वाटू शकते. त्या भाबडेपणाकडे सहृदयतेनेच पाहिले पाहिजे; परंतु म्हणून या कृतींमागे दडलेल्या अर्थाकडे दुर्लक्ष होता कामा नये. ते नीटच समजून घेतले पाहिजेत. याचे कारण राजकीय नेत्यांच्या अशा प्रतिमांचे समाजमनावर खोल परिणाम होत असतात, किंबहुना त्या हेतूनेच अशा कृती केल्या जात असतात. पंतप्रधान मोदी यांनी लखनऊमधील ऐशबागेतील दसरा मेळाव्यात भाषण केले. त्याची सुरुवात आणि शेवट त्यांनी श्रीरामाच्या जयजयकाराने केली. मुद्दा त्या घोषणांचा नाही. त्या सभेमध्ये मोदी यांच्या हाती कार्यकर्त्यांनी सुदर्शनचक्र, धनुष्यबाण आणि गदा दिली. ती मोदींनी मोठय़ा प्रेमाने मिरविली. त्याच दिवशी दिल्लीत लाल किल्ल्यासमोर झालेल्या रावणदहन कार्यक्रमात केजरीवाल यांनी धनुष्यबाण धारण केले, तर मनमोहन सिंग आणि सोनिया यांनीही हाती धनुष्यबाण घेतले. भारतीय इतिहासकथांतून वा मिथकांतून जनसामान्यांच्या मनात सुष्ट-दुष्ट, नैतिक-अनैतिक, धार्मिक-अधार्मिक अशा ‘बायनरी’ तयार होत असतात. त्यांचा वापर राजकीय नेते आपापल्या सोयीने करून घेत असतात. रावणदहन कार्यक्रमात हाती धनुष्यबाण घेतलेला नेता जनसामान्यांच्या लेखी कोणत्या स्थानी जाऊन बसत असेल याची कल्पना केलेलीच बरी. हे सारे नेणिवेच्या पातळीवर घडत असते, किंबहुना मिथकांचे आवाहन हे मुख्यत: नेणिवेलाच असते, हे समजून घेतले पाहिजे. दसऱ्यानिमित्ताने हे झाले आणि ते सारेच प्रतीकात्मक असते असे म्हणावे, तर एरवीही निवडणुकांच्या प्रचारसभांमधून हे आणि सारेच नेते वेळोवेळी तलवारी उपसताना दिसलेले आहेत. त्यातही आपले नेते दैवी आहेत, नायक आहेत आणि त्यांनी उगारलेली तलवार साऱ्या विरोधक नामक रावणांचा संहार करणार आहे, असा अर्थ दडलेला असतो. अशा तलवारी उपसणे किंवा व्यासपीठांवरून आपण म्हणजे अभिमन्यू, शिवरायांचे मावळे अशा प्रकारची विधाने करणे यातून जो संदेश दिला जातो तो म्हणूनच राजकीय नेत्यांसाठी महत्त्वाचा ठरतो. यात केवळ भाषिक अलंकारिता नसते. हा अनुयायांच्या मनातील प्रतिमासंवर्धनाचा प्रकार असतो. हे पणन व्यवहाराचे, जाहिरातविश्वाचे शास्त्र. त्याचाच यामध्ये जाणता-अजाणता वापर करण्यात येत असतो. हे तसे पूर्वीपासूनचे, परंतु आज त्याचेही तज्ज्ञ सल्लागार निर्माण झाले आहेत. सर्वसामान्यांपुढे येत असलेल्या प्रतिमा, वक्तव्ये यांना या सल्लागारांचा हस्तस्पर्श झालेला असतो. या प्रतिमा आणि वक्तव्ये ही प्रपोगंडाचा भाग असतात हे ओळखणे आवश्यक आहे. यातील शस्त्रे मिरवण्याच्या वरवर निरागस वाटणाऱ्या कृत्यांना आक्षेप घ्यावा लागेल तो लोकशाही व्यवस्थेच्या बाजूने. आजच्या काळात, संसदीय लोकशाही व्यवस्थेत मिरवण्याची ही शस्त्रे नाहीत. लोकशाहीत शस्त्र चालले पाहिजे ते शब्दांचे आणि त्यांमागील विचारांचे. ज्या व्यवस्थेत हे होत नसते, तिला छद्म लोकशाहीच म्हणावे लागेल. येता-जाता तलवारी नाचवणाऱ्या नेत्यांना याचे भान बहुधा नसतेच; पण त्यातून ते समाजाची वैचारिकता मध्ययुगाकडे नेत असतात. माणसाच्या मनातील आदिम हिंस्र भावनांना हे सुखावणारे असले, तरी हे सुख लोकशाहीसाठी घातकच हे समजून घेणे महत्त्वाचे आहे.