आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांची घोषणा आयुर्वेद आणि आयुषची महती देशभरात तसेच संपूर्ण जगभरात पोहोचली पाहिजे. यासाठी आयुष मंत्रालय येत्या काही दिवसांत जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) बरोबर सामंजस्य करार करणार आहे. तसेच देशाच्या संपूर्ण ग्रामीण भागामध्ये आयुर्वेद पोहोचवण्याचे आयुष मंत्रालयाचे मिशन आहे, अशी घोषणा केंद्रीय आयुष मंत्रालयाचे राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ व ‘साण्डू आयुर्वेद भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात केली. भारत व्याधीमुक्त करायचा आहे, या दिशेने पहिले पाऊल म्हणून २१ जून या दिवशी जागतिक योग दिन साजरा केला गेला. दुसऱ्या जागतिक योग दिनाची तयारीही गेल्या दोन महिन्यांपासून सुरू झाली आहे. आम्ही लवकरच जागतिक आयुर्वेद दिन साजरा करू अशी मला खात्री आहे, असे श्रीपाद नाईक यांनी सांगितले. गेल्या महिन्यात अमेरिकन डॉक्टरांचे एक पथक कर्करोगावर चर्चा करण्यासाठी भारतात आले होते, असे नमूद करून नाईक यांनी भारत आणि अमेरिकेदरम्यान येत्या दोन महिन्यांत कर्करोग या विषयावर संशोधन करण्यासाठी करार होत असल्याचे सांगितले. पंतप्रधानांच्या उपस्थितीत हा करार अमेरिकेमध्ये केला जाणार असल्याची त्यांनी माहिती दिली. साण्डू ब्रदर्स या कंपनीला ११७ वर्षे झाल्यानिमित्ताने नाईक यांच्या हस्ते आयुर्वेदाच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या वैद्यांचा सन्मान करण्यात आला. पद्मभूषण वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांना ‘साण्डू आयुर्वेद गौरव’ तसेच वैद्य मीरा औरंगाबादकर, वैद्य प्रवीण जोशी आणि वैद्य विवेक चांदूरकर यांना ‘आयुर्वेद भूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. माटुंगा येथील वेलिंगकर इन्स्टिटय़ूट सभागृहात हा पुरस्कार सोहळा पार पडला.