४जी या अतिजलद दूरसंचार सेवेचा देशव्यापी परवाना मिळविणारी एकमेव कंपनी असलेल्या रिलायन्स जिओ इन्फोकॉमची सेवा मार्च २०१४ नंतर पश्चिम बंगालसह पूवरेत्तर भागात सुरू होणार असून, यासाठी कंपनीने ७,००० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीची तयारी केली आहे. कंपनीची ४जी ब्रॉडबॅन्ड सेवा आर्थिक राजधानी मुंबईसह दिल्लीतही २०१३ अखेपर्यंत सुरू होणार आहे.
पूवरेत्तर भागातील केवळ पश्चिम बंगालसाठी कंपनीने ३,००० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचे निश्चित केले असून, या भागातील विस्तारासाठी ७,००० कोटी रुपयांचे लक्ष्य व बिहार, झारखंड, ओडिशा तसेच उत्तर-पूर्व राज्यांमध्ये येत्या दोन ते तीन वर्षांत सेवा सुरू करण्यात येईल, अशी माहिती कंपनीचे व्यवसाय प्रमुख तरुण झुनझुनवाला यांनी दिली.
पश्चिम बंगालसाठी कंपनी ४,५०० किलो मीटरचे ऑप्टिक फायबर केबलचे जाळे टाकणार असून, राज्यातील ५६ शहरांमध्ये ३,५०० टॉवर उभारले जाणार आहेत. यासाठी मुकेश अंबानी प्रवर्तित रिलायन्सने बंधू अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सबरोबर व्यवसाय सहकार्य केले आहे. रिलायन्स कम्युनिकेशन्सद्वारे पुरविण्यात येणाऱ्या पायाभूत सेवेपैकी २५ ते ३० टक्के हिस्सा पश्चिम बंगालमधील सेवेचा असेल, असेही झुनझुनवाला यांनी सांगितले. यामार्फत येथे ५,००० रोजगारही उपलब्ध होतील.
४जी तंत्रज्ञानावरील अतिजलद ब्रॉडबॅन्ड सेवा पुरविण्यासाठी सर्व २२ परवाने रिलायन्स जिओ इन्फोकॉमने मिळविले आहेत. तर त्यासाठीच्या १.२० लाख किलोमीटर ऑप्टिक फायबरचे जाळे रिलायन्स कम्युनिकेशन्सद्वारे विणले जाणार आहे.
मुंबई, दिल्लीसह रिलायन्सची मुख्य कर्मभूमी असलेल्या जामनगरमधूनही डिसेंबर २०१३ पर्यंत ही सेवा सुरू होईल, तर एप्रिल ते जून या २०१४-१५ च्या पहिल्या तिमाहीत देशातील प्रमुख महानगरांमध्ये सेवा सुरू होईल.