‘उद्योगश्री’ पुरस्कार सोहळ्यातील उद्गार महाराष्ट्रातील उद्योगासाठीच्या कायद्यांची संख्या ६५ वरून २५ वर आणली जात असून राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्समुळे उद्योगांना ‘चहा-पाण्या’विनाही व्यवसाय करता येणे शक्य असल्याचे मार्मिक भाष्य राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी नुकतेच येथे केले. २३ व्या उद्योगश्री गौरव सन्मान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. मुनगंटीवार म्हणाले की, सध्याच्या स्पर्धेच्या युगात साहित्यिकतेबरोबरच प्रयोगशिलता आणि कल्पनेची साथ मिळाल्यास उद्योगांना खऱ्या अर्थाने चालना मिळू शकेल. उद्योगात महाराष्ट्र अग्रेसरच असून राज्याचा विकास दर हा शेजारच्या गुजरातपेक्षा अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या बाबासाहेब डहाणूकर सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोकियो कॅम्लिनचे मानद अध्यक्ष सुभाष दांडेकर होते. तर व्यासपीठावर केसरी टुर्सचे केसरी पाटील, उद्योगश्रीचे भीमाशंकर कठारे आदी उपस्थित होते. अॅक्युटेस्ट रिसर्च लेबोरटरीजचे डॉ. सतीश सावंत यांना यावेळी उद्योगश्री जीवन गौरव तर प्रमोदकुमार बेलसरे, रामचंद्र सावे, संतोष मंडलेचा, गजानन देशपांडे, हर्षल वालावलकर, ऋषिकेश बदामीकर, डॉ. अजित मराठे, राजेंद्र सावंत, माया परांजपे, शीतल साळी यांना उद्योगश्री गौरव सन्मानाने गौरविण्यात आले.