मुंबई : सरलेल्या वर्षांत ऑक्टोबरमध्ये ‘सेन्सेक्स’ने ६२,२४५.४३ अंशांची ऐतिहासिक उच्चांकी पातळी गाठल्यानंतर, परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी (एफआयआय) भांडवली बाजारात नफवसुलीला प्राधान्य देत मोठा निधी काढून घेतला आहे. मागील सात वर्षांत टप्प्यप्प्प्याने गुंतविलेला पैसा त्यांनी अवघ्या सात महिन्यांच्या कालावधीत माघारी नेला आहे.

एनएसडीएलने दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२१ पासून परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी देशांतर्गत भांडवली बाजारातून २.५ लाख कोटी रुपयांचा  निधी काढून घेतला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी प्रथमच इतक्या कमी कालावधीत मोठय़ा प्रमाणावर समभाग विक्रीचा मारा केला गेला आहे. याच गुंतवणूकदारांनी २०१४ ते २०२० दरम्यान भांडवली बाजारात २.२ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती. तर २०१० ते २०२० दरम्यान एफआयआयची भांडवली बाजारात ४.४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आली होती. मात्र परदेशी गुंतवणूकदारांनी केलेल्या समभाग विक्रीच्या माऱ्यामुळे एफआयआयच्या भांडवली बाजारातील योगदानामध्ये निम्म्याहून अधिक घट झाली आहे.

भारतासह सर्वच उभरत्या अर्थव्यवस्था असणाऱ्या बाजारपेठांमध्ये वाढलेली महागाई, रशिया-युक्रेन युद्ध आणि उत्तरोत्तर बिकट बनत असलेली भू-राजकीय परिस्थिती आणि देशांतर्गत समभागांचे महागडे मूल्यांकन यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना या बाजारपेठा अनाकर्षक ठरत असल्याने समभाग विक्री मारा कायम राहिला आहे.

उभरत्या अर्थव्यवस्थांना सर्वाधिक फटका

  • परदेशी गुंतवणूकदारांनी भारताबरोबरच तैवान आणि दक्षिण कोरियासारख्या उभरत्या अर्थव्यवस्था असणाऱ्या बाजारांतूनही निधी काढून घेतला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी २०२२ मध्ये आतापर्यंत तैवानमधून २८ अब्ज डॉलर तर दक्षिण कोरियामधून १२.८ अब्ज डॉलर काढून घेतले आहेत.