|| अजय वाळिंबे पोर्टफोलियोचा आढावा - जानेवारी ते मार्च २०२१ कोविडग्रस्त २०२० सरल्यानंतर, १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प जाहीर झाला. अर्थमंत्र्यांनी म्हटल्याप्रमाणे हा अर्थसंकल्प नीट राबवला गेला, तर अर्थव्यवस्थेत खरेच चांगली सुधारणा दिसू शकते. अर्थसंकल्प जाहीर झाल्यानंतर शेअर बाजाराने घेतलेली उसळी गुंतवणूकदारांचा उत्साह वाढवणारीच होती. अनेक अर्थतज्ज्ञांनी या अर्थसंकल्पाचे स्वागत केल्याने तसेच जगभरात सुरू झालेली लसीकरणाची मोहीम, कंपन्यांनी जाहीर केलेले तिसऱ्या तिमाहीचे अर्थात डिसेंबर २०२० पर्यंतचे (नऊमाहीचे) आश्वाासक आर्थिक निकाल आणि एकंदरीतच अपेक्षित असलेली बहुतांश क्षेत्रातील ‘व्ही शेप रिकव्हरी’ यामुळे शेअर बाजारातील वातावरण चैतन्याचे आणि तेजीचे राहिले. मात्र गेल्या दोन आठवड्यांपासून करोनाच्या वाढत्या संसर्ग लाटेमुळे शेअर बाजारात पुन्हा एकदा नैराश्य आले आहे. गेल्या वर्षातील अनिश्चिात वातावरणात देखील अनेक गुंतवणूकदारांनी (अगदी नवख्यासुद्धा) उत्तम कमाई केली आहे आणि फेब्रुवारीत निर्देशांक ५२,००० वर गेल्यावर आता निर्देशांकाचा पुढचा विक्रम ३१ मार्चपर्यंत होणार का अशीही आशा अनेकांच्या मनात डोकावू लागली होती. शेअर बाजारातील या उत्साहाचा फायदा घेत गेल्या तीन महिन्यांत अनेक ‘आयपीओं’ना उत्तम प्रतिसाद मिळून त्यांच्या शेअर्सची विक्रमी नोंदणी झाली. यामध्ये प्रामुख्याने इंडिगो पेंट्स, स्टोव्ह क्राफ्ट, न्यूरेका लिमिटेड, रेल-टेल कॉर्पोरेशन, एमटार टेक्नॉलॉजीज, लक्ष्मी ऑरगॅनिक्स आणि नुकताच लिस्ट झालेला नजारा टेक्नॉलॉजीज या कंपन्यांचा समावेश करावा लागेल. ३१ मार्च २०२१ रोजी मुंबई शेअर बाजार निर्देशांक ४९,५०९ वर बंद झाला. मार्च २०२१ साठी संपलेले हे आर्थिक वर्ष गेल्या ११ वर्षातील सर्वोत्तम आर्थिक वर्ष आहे. नवीन आर्थिक वर्षांत भारतीय अर्थव्यवस्था १०.१% वेगाने वाढेल असा जागतिक बँकेचा अंदाज आहे. ‘माझा पोर्टफोलियो’मध्ये सुचविलेल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये ज्या वाचकांनी/ गुंतवणूकदारांनी गुंतवणूक केली असेल त्यांना चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत १.६ टक्के असे अल्पसे नुकसान सहन करावे लागले आहे. अर्थात सदरात सुचविलेली गुंतवणूक ही मध्यम ते दीर्घकालीन कालावधीसाठी असल्याने गुंतवणूकदारांनी संयम दाखवणे गरजेचे आहे. तसेच संधी मिळताच ‘ब्लू चिप’ शेअर्समध्ये गुंतवणूक करत राहावी. तसेच वेळोवेळी सांगितल्याप्रमाणे कुठलीही खरेदी किंवा विक्री टप्प्याटप्प्यानेच करावी. एक एप्रिलपासून सुरू झालेले नवीन आर्थिक वर्ष ‘माझा पोर्टफोलियो’च्या वाचकांना असेच भरभराटीचे आणि यशस्वी जावो हीच सदिच्छा! संयम-सबुरी फलदायीच. या स्तंभातून गेल्याच वर्षात सुचविलेल्या काही कंपन्यांच्या शेअर्समधील गुंतवणूक आता दुप्पट किंवा तिप्पट झाली आहे. तसेच काही शेअर्स दुपटीकडे जात आहेत. पोर्टफोलियोने एकंदर ४०.१% निव्वळ परतावा दिला आहे. वाचक गुंतवणूकदारांच्या माहिती करता संयम आणि अभ्यासपूर्ण गुंतवणूक अल्प कालावधीत किती फायदा करून देऊ शकते हे पुढील तक्त्यावरून लक्षात येईल :