’ भालचंद्र जोशी गुंतवणूक रूपात असलेली प्रतीकात्मक लक्ष्मी सरस्वतीच्या माध्यमातूनच प्रसन्न होत असते. नवरात्रीच्या निमित्ताने या लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या कालातीत नियमांची पुन्हा एकवार उजळणी.. या देवी सर्वभूतेषु बुद्धिरूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:॥ सरस्वती ही बुद्धीची देवता आहे. म्हणूनच देवी सुक्तात सरस्वती देवीचे वरील वर्णन केले आहे. नवरात्रीच्या निमित्ताने म्हणूनच सरस्वतीच्या माध्यमातून गुंतवणूक रूपात असलेली प्रतीकात्मक लक्ष्मी प्रसन्न व्हावी यासाठी काही कालातीत नियमांची आठवण करून देतो. १. गुंतवणुकीस लवकर सुरुवात करा गुंतवणुकीच्या प्रवासातील सर्वात पहिली पायरी म्हणजे गुंतवणुकीला लवकर सुरुवात करा. अनेक लोकांना भांडवली बाजारात गुंतवणूक करण्याची इच्छा असते, पण गुंतवणूक करण्याची हिम्मत होत नाही. बाजाराच्या बाबतीत ऐकलेल्या गोष्टींनी भीती निर्माण झालेली असते. तसेच योग्य मार्गदर्शनाचा अभाव असल्याने योग्य ठिकाणी गुंतवणूक केली जात नाही. योग्य मार्गदर्शकाच्या मदतीने शक्य तितक्या लवकर गुंतवणुकीला सुरुवात करा. चक्रवाढीचे सामथ्र्य समजून घेणे अतिशय गरजेचे आहे. तुम्ही पैसे गुंतवता आणि मुद्दलावर व्याज कमवता. पुढील वर्षी मूळ मुद्दल आणि मिळालेल्या व्याजाच्या रकमेवर मिळून अधिक व्याज मिळते. अनेक वर्षे व्याजावर व्याज मिळाल्याने मूळ रकमेसोबत एकूण जमा रक्कम वाढत जाते. अगदी अल्बर्ट आइन्स्टाइनदेखील चक्रवाढ व्याजाची ताकद पाहून अचंबित झाले होते. म्हणून त्यांनी चक्रवाढीला जगातील आठवे आश्चर्य म्हणून संबोधले. व्याजाचा किंवा समभाग गुंतवणुकीतून मिळणाऱ्या वार्षिक वाढीचा दर आपल्या हातात नसला तरी गुंतवणुकीला लवकर सुरुवात करणे आपल्या हातात आहे. जेणेकरून गुंतवणुकीचा कालावधी वाढू शकेल. २. गुंतवणुकीबाबत दीर्घकालीन दृष्टिकोन बाळगा गुंतवणूक वेगवेगळ्या वित्तीय ध्येयांनी प्रेरित होऊ न केलेली असते. वित्तीय ध्येये पूर्ण होण्यास प्रदीर्घ कालावधी उपलब्ध असतो. दीर्घकाळासाठी गुंतवणूक केल्यास अशी गुंतवणूक दीर्घकाळात मोठे फायदे मिळवून देते, हे आता सिद्ध झाले आहे. गुंतवणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर योग्य गुंतवणूक पर्याय निवडून आर्थिक निर्णय घेण्यासाठी आवश्यक मानसिकता आणि शिस्त विकसित करा. जेणेकरून तुम्ही यशस्वी दीर्घकालीन गुंतवणूकदार बनू शकाल. ३. कर्ज काढून बाजारात गुंतवणूक करू नका ‘मार्जिन फंडिंग’ हा बाजारात थेट गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी परवलीचा शब्द आहे. तुमच्या गुंतवणूक रकमेच्या दुप्पट किंवा तिप्पट रक्कम उपलब्ध करून देणाऱ्या दलालांचे पीक आले आहे. बाजार आणि अनिश्चितता या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घेतलेल्या कर्जाची परतफेड हे शाश्वत तर बाजारातील परतावा हा अशाश्वत आहे. बाजारात कर्ज काढून गुंतवणूक करणे टाळायला हवे. या संदर्भात वॉरेन बफे यांच्या एका वाक्याची आठवण करून देणे गरजेचे वाटते. बफे म्हणतात, तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी कर्ज काढण्याची आवश्यकता नाही. (‘टू क्रिएट वेल्थ यू डू नॉट नीड टू लिव्हरेज युवरसेल्फ’). ४. ‘पोर्टफोलिओ’त वैविध्य जपा बाजारात दोन प्रकारच्या जोखीम असतात. पहिल्या प्रकारची जोखीम बाजाराशी संबंधित असून ती सर्व गुंतवणुकीला लागू होते. उदा. व्याज दर वाढण्याची किंवा कमी होण्याची जोखीम सर्व प्रकारच्या रोख्यांना लागू होते. एखाद्या कंपनीच्या रोख्यांची पत कमी होण्याची जोखीम त्या कंपनीच्या रोख्यांना लागू होते. म्हणून रोखे गुंतवणुकीत व्याजाशी संबंधित जोखीम कमी किंवा अधिक करता येणार नाही. कारण ती बाजाराशी संबंधित जोखीम आहे. परंतु रोख्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या फंडात वेगवेगळ्या मुदतीच्या, वेगवेगळ्या उद्योग क्षेत्रातील कंपन्यांच्या रोख्यांचा समावेश करून जोखीम कमी करता येते. म्हणून समभाग किंवा रोखे गुंतवणुकीतील जोखीम ‘पोर्टफोलिओ’मध्ये वैविध्य आणून कमी करता येते. ५. गुंतवणुकीत सातत्य राखा बाजाराचा कल जाणून गुंतवणूक करणे किंवा बाजाराचे टायमिंग साधणे प्रत्येकाला जमेलच असे नाही. मोठय़ा तज्ज्ञांनादेखील वेळ साधणे जमलेले नाही. यामुळे बाजाराचा भविष्यातील कल कसा राहील याबाबत अंदाज बांधून गुंतवणूक करण्यापेक्षा गुंतवणुकीत सातत्य राखल्याने परतावा वाढतो. बाजारातील चढ आणि उतार नाटय़मय असतात. म्हणून दीर्घकाळ सातत्य राखून गुंतवणूक केल्यास ती अधिक लाभदायक ठरते. * लेखक व्हाइट ओक कॅपिटल मॅनेजमेंटचे कार्यकारी संचालक व मुख्य परिचालन अधिकारी bhalchandra.joshi @whiteoakindia.com (म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्याआधी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)