पाच मोटारसायकलवरून अचानकपणे आलेल्या १५ तरुणांनी नळदुर्ग-तुळजापूर रस्त्यावर गंधोरा पाटीजवळ तुळजापूरहून नळदुर्गकडे येणारी बस जाळली. या बसच्या टायरसह आतील आसने जळून खाक झाली आहेत.
मंगळवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास तुळजापूरहून नळदुर्गकडे येणारी तुळजापूर आगाराची बस (एमएच२०-बीएल०५६६)  अज्ञात तरुणांनी जाळण्याचा प्रयत्न केला. पाच मोटारसायकलवरून आलेल्या १५ अज्ञात तरुणांनी गंधोरा पाटीजवळ बस थांबवून बसमधील प्रवाशांना खाली उतरवले व बसला आग लावली. यामध्ये बस पूर्णपणे जळून खाक झाली. सध्या कुठल्याही प्रकारचे आंदोलन सुरू नसताना अशा प्रकारचे कृत्य समाजकंटकांनी का केले, हे समजू शकले नाही. त्याचबरोबर नळदुर्गहून तुळजापूरकडे जाणारी बस (एमएच२५-बीएल९१९६) या बसलाही हुगलूर पाटीजवळ समाजकंटकांनी जाळण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी बसचालकाच्या सतर्कतेमुळे समाजकंटकांचा प्रयत्न फसला. या तरुणांनी बसवर दगडफेकही केली होती. या प्रकारामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. बस जाळल्याची घटना समजताच नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक  फुलचंद मेंगडे हे तत्काळ पोलिसांसह घटनास्थळी धावून गेले. मात्र तोपर्यंत बस जाळणारे तरुण पसार झाले होते. सध्या पोलीस त्या अज्ञात तरुणांचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे तुळजापूर आगाराने तुळजापूर-नळदुर्ग बससेवा बंद केली आहे.