सुहास सरदेशमुख लोकसत्ता

औरंगाबाद: ‘होय हे संभाजीनगरच’., ‘ जिथे वृत्ती रझाकारी तिथे शिवसेना वार- करी’ असे फलक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेपूर्वी देत शिवसेनेकडून हिंदूत्वाचा नारा अधिक उंचावला जाईल असे संकेत देण्यात आले आहेत. दुसरीकडे पाणी प्रश्नावरून आणि विकासाच्या मुद्दयावरून घेरण्याची तयारी भाजप आणि एमआयएमकडून केली जात आहे.

 ‘होय , हे संभाजीनगरच ’असे फलक लावून नामांतराचा प्रश्न पुन्हा चर्चेत आणण्याची तयारी शिवसेनेने सुरू केली असली तरी मुख्यमंत्र्याचे या संदर्भातील वक्तव्य त्यांना अडचणीत आणणारे ठरू शकेल. दुसरीकडे ‘एमआयएम’ हा पक्ष रझाकाराशी संबंध असल्याचा आरोप शिवसेनेचे हिंदूत्व हे भाजप आणि मनसेपेक्षा वेगळे आणि अधिक आक्रमक असल्याचे संदेश देण्याची वातावरण निर्मिती सुरू झाली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील खुलाताबाद येथे औरंगजेबच्या कबरीवर भगवा फेटा घालून नतमस्तक होणाऱ्या खासदार इम्तियाज जलील यांच्यावर रझाकाराची मानसिकता व वृत्ती असल्याचा आरोप करत शिवसेना आक्रमक झाली आहे. पण तत्पूर्वीच नतमस्तक होण्याची ती कृती केवळ मुस्लीम रिवाजाचा भाग होता. औरंगजेब एमआयएमचा आदर्श नाही तसेच रझाकाराशीही आमचा संबंध नाही, अशी भूमिका खासदार इम्तियाज जलील यांनी मांडली. मोगलांच्या व निजामाच्या ४०० वर्षांपूर्वीच्या पराभवाचे खापर आता मुस्लिमांवर फोडणे चुकीचे असल्याची भूमिका खासदार जलील यांनी व्यक्त ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केली. केलेली कृती आणि व्यक्त केलेली भूमिका यातील विरोधाभास कळ काढून पळून जाणारी असल्याची टीकाही होत आहे.

एका बाजूला हिंदूत्वाचा आवाज अधिक आक्रमक असल्याचा संदेश शिवसेनेकडून दिले जात असतानाच कॉग्रेस व राष्ट्रवादीशी त्यांचा संग यावरून भाजप आणि एमआयएम यांची टीका एका समान रेषेवर आली आहे. महापालिकेच्या कारभारावरून होणारी टोकादार टीका आता नव्याने सुरू होण्याची शक्यता आहे. महापालिकेचा कारभार शिवसेना नेतृत्वाच्या हातात असताना ढिसाळ होताच. त्याला भाजपचीही तेवढीच साथ होती. पण करोनाकाळात प्रशासक नेमल्यानंतर स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पातून शहरात अनेक उपक्रम सुरू झाले. किमान काही सकारात्मक होत असल्याचा संदेश प्रशासकीय कारभारातून पुढे येऊ लागला. हे प्रशासकीय काळातील सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी खऱ्या अर्थाने चालना दिली तरी पालकमंत्री सुभाष देसाई यांनी. त्यामुळे रस्ते व कचरा प्रश्नी झालेल्या बदलाचे श्रेय शिवसेनेकडून घेतले जात आहे. प्रशासक अस्तिककुमार पांडेय हे शिवसेनेचे किंबहुना पालकमंत्र्यांचे अधिक ऐकतात, असेही आरोप करण्यात आले. प्रशासकीय कार्यकाळात जी काही प्रगती झाली तसा विकास वेग ठेवण्यात सत्ताधारी म्हणून करण्यात शिवसेना कमी पडली, हे वास्तव निवडणुकीच्या प्रचारापर्यंत टिकण्याची शक्यता कमीच दिसून येत आहे. कारण आता प्रचार रझाकारी वृत्तीभोवती केंद्रित करण्याची रणनीती शिवसेनेकडून आखली जात आहे.

बुधवारी होणाऱ्या मुख्यमंत्र्यांच्या सभेपूर्वी एमआयएमकडून शिवसेनेने विकास प्रश्नावर बोलावे अशी १५ प्रश्नांची प्रश्नावली तयार केली असून त्यात औरंगाबादला मुबलक आणि वेळेवर पाणी मिळणार आहे किंवा नाही, त्याचा अचूक महिना जाहीर करावा. औरंगाबाद येथे मंजूर झालेल्या पण पुणे् येथे स्थालंतरित करण्यात आलेल्या क्रीडा विद्यापीठासाठी काय प्रयत्न केले जाणार, ऑल इंडिया इन्स्टिटय़ूट अ‍ॅण्ड मेडिकल सायन्स अर्थात एम्स कधी पूर्ण होणार, प्लानिंग अ‍ॅण्ड आर्किटेक्चर ही मंजूर झालेली संस्था कधी सुरू होणार, आंतरराष्ट्रीय विमानसेवा कधी सुरू होऊ शकेल असे १५ प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.

भाजपकडून रणनीती अनेक वर्षे युतीमध्ये राहिलेल्या भाजपने पाणीसमस्येचा गुंता आपल्यामुळे कधीच नव्हता. तो प्रश्न केवळ शिवसेनेमुळे चिघळला असा संदेश देण्यासाठी जलआक्रोश मोर्चा काढला. त्याला यशही मिळाले. त्यामुळे पाणी प्रश्नाभोवती शिवसेनेला घेरण्याची भाजपाची तयारी आजही सुरू असल्यानेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पाणीप्रश्नाचा आढावा घेतला. नि:स्पृह अशी ओळख असणारे अधिकारी सुनील केंद्रेकर यांनी या प्रश्नी लक्ष घालण्याच्या सूचना केल्या. त्यामुळे पाणी प्रश्न सोडविण्यासाठी सरकार सजग असल्याचा संदेश शिवेसनेकडून देण्यात आला आहे. पण निवडणुकीपर्यंत विकासप्रश्न बाजूला पडून निवडणुका ध्रुवीकरणाच्या दोन टोकावरच असतील असे सांगण्यात येत आहे.