छत्रपती संभाजीनगर: बिंदू नामावली आणि संच मान्यतेची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, त्यानंतर शिक्षक भरतीबाबतचे संकेतस्थळ सुरू होईल. ऑक्टोबर अखेर पहिल्या टप्प्यात ३० हजार शिक्षकांना नियुक्ती आदेश दिले जातील असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी स्पष्ट केले. या भरतीनंतर बदलीचे धोरण बदललेले असेल. त्यानंतर शिक्षकांना दहा वर्षांपर्यंत एकाच ठिकाणी काम करावे लागणार आहे. अगदीच अपरिहार्य स्थितीमध्ये बदली केली जाईल. अन्यथा जेथे नियुक्ती तेथेच सेवानिवृत्तीपर्यंत काम करावे लागणार आहे. असे केल्याने शिक्षकांना गुणवत्तेसाठी जबाबदार धरणे शक्य होईल, असे मत केसरकर यांनी व्यक्त केले. औरंगाबाद येथे विद्या प्राधिकरणाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पहिलीपासून कृषी शिक्षण या वर्षी पहिलीपासून कृषी शिक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शालेय उपक्रमात शेती शिक्षणासाठी आवश्यक तो अभ्यासक्रम पुढील वर्षांपर्यंत राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण व संस्थेकडून तयार होईल. मात्र, तोपर्यंत न थांबता अगदी पहिलीपासून हा अभ्यासक्रम शिकविणे हाती घेतले जाईल. खरे तर हा अभ्याक्रम पाचवीपासून करण्याची घोषणा माजी कृषीमंत्र्यांनी केली होती. कोणत्या वर्षांपासून शिक्षण द्यावे, हे कृषी विभागाने सांगितले तरी चालेल. मात्र, ही प्रक्रिया याच शैक्षणिक वर्षांपासून सुरू केली जाणार आहे. केंद्रस्तरावर क्रीडा व कला शिक्षक केंद्रप्रमुखांच्या परीक्षा घेऊन ती पदे भरली जातील. या शिवाय प्रत्येक केंद्रस्तरावर कला व क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे. अद्याप त्याबाबतचा निर्णय घेण्यात आलेला नाही. केंद्रप्रमुखासह विविध पदांसाठी परीक्षा घेण्याची प्रक्रिया आता सुरू करण्यात आली आहे. यावेळी विविध शिक्षक संघटनांच्या वतीनेही रिक्त जागा भरण्याबाबतची निवेदने शिक्षणमंत्र्याकडे दिली.