औरंगाबाद शहरात गुरुवारी रात्रीपासून सुरू झालेल्या पावसामुळे तो आता परततोय, अशीच चिन्हे दिसू लागली आहेत. खगोलशास्त्राचे अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी ही शक्यता फेटाळली. परतीचा पाऊस खूपच कमी दिवस राहील व सप्टेंबरमध्येच ऑक्टोबर हिट जाणवेल, असा अंदाज आहे. त्यामुळे पुन्हा एकदा गारपीट होण्याची शक्यता ते वर्तवितात.
परतीचा पाऊस अधिक चांगला असण्याची शक्यता कमी असल्यामुळे रब्बी पिकांना फटका बसू शकतो. १७९० ते १८३० हा काळ खगोलशास्त्रात डाल्टन मिनिमम म्हणून ओळखला जातो. या काळात पाऊस कमी कमी होत जातो. लघुहिमयुगाचा काळ असे त्याला नमूद केले जाते. गेल्या काही दिवसांत वातावरणातील बदल याच दिशेने होत असल्याचा दावा औंधकर करतात. पृथ्वीवरील हवामानाचा खगोलशास्त्रीय संबंध असतोच. त्याचा परिणाम म्हणून हवामानातील हे बदल चिंताजनक असल्याची माहिती त्यांनी दिली. या पूर्वीही गारपीट होण्याची त्यांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली होती.
दरम्यान, बऱ्याच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत गुरुवारी रात्री पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद शहरासह परिसरात रात्री अकराच्या सुमारास तासभर पाऊस पडला. शुक्रवारी दुपारीही पावसाच्या श्रावणसरी बरसल्या. अगदी ऊन-पावसाचा खेळ काही मिनिटे सुरू होता. मराठवाडय़ात ज्या भागात तीव्र दुष्काळ आहे, त्या तिन्ही जिल्ह्यांत पाऊस पडल्याची नोंद नाही.