कुठे भयंकर आग लागली असेल तर फायर ब्रिगेड प्राण पणाला लावून माणसांचे जीव वाचवतात. प्रचंड पूर आला असेल तर आपले जवान तत्परतेने धाव घेतात. आणि कधी अपघात झाला तर तातडीने वैद्यकीय चमू येतो. या मदतीला तोड नाही. पण त्यासाठी सतत धावपळ करणाऱ्या माणसांना मात्र त्याचा त्रास होऊ  शकतो.

म्हणूनच संकटांच्या वेळी पहिली मदत रोबोट्सनी पोचवायची कल्पना आता पुढे आली आहे. नैसर्गिक आपत्ती असो नाहीतर इतर- मदतीसाठी खास रोबोट्स असतील आणि ड्रोन्सच्या सहाय्याने ते अगदी पटकन् घटनास्थळी पोचतील.. अशी ही कल्पना!

या कल्पनेची सुरुवात झाली सोळा-सतरा वर्षांपूर्वी. मात्र, ड्रोन्स आल्यावर या संशोधनाला आणखी वेग आला. ड्रोन म्हणजे छोटं विमानच म्हणा ना! तुम्ही रिमोटने उडवता तसं. त्यात पायलट नसल्याने आकार लहान असतो. दिशा ओळखून दिलेल्या जागी पोचण्यासाठी त्यामध्ये ऑटोमॅटिक यंत्रणा असते. दूर अंतरावरून संदेश देऊनसुद्धा ड्रोनचं नियंत्रण करता येतं.

डोंगरातला अवघड रस्ता असेल किंवा शहरात अफाट ट्रॅफिक असेल तर ड्रोन्समुळे बराच फायदा होतो. अशा ड्रोन्सवर स्वार होऊन हे रोबोट्स मदतीला जातील. एखादी इमारत कोसळली असेल तर ढिगाऱ्याखाली खूप जण अडकतात. त्यांना रोबोट्स सेन्सर्स वापरून शोधून काढतील. गरज भासली तर थेट ढिगाऱ्यात घुसतील. त्यांना गुदमरण्याची धास्ती नसते की हात-पाय मोडण्याची भीती.

आगीसाठी फायरप्रूफ रोबोट्स आणि पुरासाठी वॉटरप्रूफ रोबोट्स बनवता येतील. पुरात अडकलेल्यांना अनेकदा हेलिकॉप्टरमधून अन्न आणि औषधं पुरवतात. तेही काम ड्रोन्स आणि रोबोट्सकडे सोपवता येईल.

आपल्या भारतीय संरक्षण संशोधन संस्थेचा ‘दक्ष’ रोबॉट हा बॉम्ब आणि स्फोटकं शोधून काढण्यासाठी वापरला जातो. एकूण वीस ‘दक्ष’ रोबोट्स धोकादायक कामात सैनिकांना मदत करत आहेत. विविध आपत्तींच्या वेळीदेखील ‘दक्ष’ वापरावेत असा विचार आता सुरू आहे.

रोबोट्सचा हा वापर अजून नवीन आहे, पण तो किती उपयोगी पडेल ते वेगळं सांगायला नको!

meghashri@gmail.com