सरसंघचालक मोहन भागवत यांनी देशांमध्ये ‘अन्यां’ची लोकसंख्या वाढत असताना हिंदूंच्या संख्येमध्ये मात्र घट होत असल्याचे वक्तव्य मध्यंतरी केले होते. या विधानाचा समाचार घेणाऱ्या ‘लेकुरे उदंड जाली’ या अग्रलेखावर व्यक्त होणारा औरंगाबादच्या ‘जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालया’चा विद्यार्थी मुकुल निकाळजे ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाची विजेता ठरला. तर, या स्पर्धेत यवतमाळमधील ‘बाबाजी दात्ये कला आणि वाणिज्य महाविद्यालया’चा विद्यार्थी शिवानंद बुटले याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘लेकुरे उदंड जाली’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या मुकुल व शिवानंद यांनी चांगले लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. मुकुलला सात हजार आणि प्रमाणपत्र तर शिवानंद यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल.

‘लेकुरे उदंड जाली’ या अग्रलेखावर मत व्यक्त करताना अनेक विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट लेखन करत आपल्यातील संशोधक वृत्ती जपल्याचे दिसून आले. प्रथम पारितोषिक पटकावणाऱ्या मुकुल निकाळजे याने विषयाची मांडणी करताना सखोल आकडेवारी दिली होती. यात योगेश नाडकर्णी, नितीन आगे, राजकुमार सातपुते आदींनी या स्पर्धेत विशेष उल्लेखनीय लेखन केले. तर विशेष बाब म्हणजे ओंकार माने, मंथन बिजवे, बाळासाहेब खामकर या गतविजेत्यांनीही चांगले परिश्रम घेत ब्लॉग बेंचर्स स्पर्धेत आपला सहभाग कायम राखला. या स्पर्धेमध्ये आपल्या वैचारिक वृत्तीला चालना देणाऱ्यांची संख्या वाढती असून राज्यभरातून अधिकाधिक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवत आहेत. त्यामुळे, योग्य विजेता निवडण्यासाठी परीक्षकांना विशेष मेहनत घ्यावी लागत आहे.

महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी प्रत्येक वेळी भरभरून प्रतिसाद देत आपला सहभाग ‘ब्लॉग’द्वारे नोंदविला आहे. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. तसेच, विद्यापीठांचे व प्राचार्याचे मोलाचे सहकार्य स्पर्धेला दिले आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.