आपल्या देशातील शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढीने पुकारलेला अघोषित संप देशाला अंधाराकडे घेऊन जाणारा असून शेतीच्या प्रश्नावर गेली दहा वर्षे नुसती चर्चाच होत आहे. या विषयावर बेतलेल्या ‘घराणेशाहीची गरज’ या अग्रलेखावर व्यक्त होणाऱ्या पेठ येथील ‘नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालया’चा विद्यार्थी वैभव मुळीक ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाचा विजेता ठरला. तर या स्पर्धेत पुण्यातील ‘सर परशुरामभाऊ महाविद्यालया’चा विद्यार्थी सौरभ कदम याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘घराणेशाहीची गरज’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या वैभव आणि सौरभ यांनी चांगले लेखन करत ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत बाजी मारली. वैभव यास सात हजार आणि प्रमाणपत्र तर सौरभ यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना अजित साळुंखे, सुशील कोरे, आशीष पाटील, पूजा माने राज्यभरातील या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी विचारी वृत्तीला चालना देत उत्तम लेखन केले.

राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो, त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकांची बक्षिसे काढली जातात. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers  या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.