आयआयटीसारख्या संस्थेत मुलींचे प्रमाण वाढवण्यासाठी केवळ आरक्षणाचे गाजर दाखवणे फारसे उपयोगाचे नाही. असे स्पष्ट प्रतिपादन करणाऱ्या ‘मुलींसाठी मलमपट्टी’ या अग्रलेखावर व्यक्त होणारी पुण्याच्या ‘महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या सिद्धिविनायक महिला महाविद्यालया’ची विद्यार्थिनी शीतल जायभाय ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत पहिल्या पारितोषिकाची विजेती ठरली. तर, या स्पर्धेत परळीच्या ‘वैद्यनाथ महाविद्यालया’चा विद्यार्थी विश्वजीत आंधळे याने दुसरे पारितोषिक पटकावले.

‘मुलींसाठी मलमपट्टी’ अग्रलेखावर मत मांडणाऱ्या शीतल आणि विश्वजीत यांनी चांगले लेखन करीत ‘ब्लॉग बेंचर्स’स्पर्धेत बाजी मारली. शीतल हीस सात हजार आणि प्रमाणपत्र तर विश्वजीत यास पाच हजार आणि प्रमाणपत्र असे बक्षीस देण्यात येणार असून या विद्यार्थ्यांना त्यांच्या महाविद्यालयांच्या प्राचार्याच्या हस्ते गौरविण्यात येईल. या अग्रलेखावर व्यक्त होताना राज्यभरातील अनेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या विचारी वृत्तीला चालना देत उत्तम लेखन केले. त्यातही अस्मिता कळंबे या विद्यार्थिनीने उत्तमरीत्या लेखन केले.

राज्यातील बहुतेक महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ‘ब्लॉग बेंचर्स’ स्पर्धेत सहभाग वाढत आहे. महाविद्यालयीन युवा शक्तीच्या लेखणीला व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. यात प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी ‘आठवडय़ाचे संपादकीय’ या शीर्षकाखाली नवीन लेख प्रसिद्ध करण्यात येतो. त्यावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. त्यांना पुढील आठवडय़ाच्या गुरुवापर्यंतची मुदत दिली जाते. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या लेखांचे परीक्षण तज्ज्ञ परीक्षकांकडून केले जाते. त्यानंतर पहिल्या व दुसऱ्या क्रमांकाची बक्षिसे काढली जातात. पहिल्याच लेखापासून या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. विजेत्या विद्यार्थ्यांचे लेख ‘लोकसत्ता’मध्ये प्रसिद्ध केले जातात. ‘लोकसत्ता’च्या राज्यभरातील वाचकांना या निमित्ताने तरुणाईचे अंतरंग समजून घेण्याची संधी मिळते. या स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना indianexpress-loksatta.go-vip.net/Blogbenchers या संकेतस्थळाला भेट देऊन आपली भूमिका मांडायची आहे.