‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे सरचिटणीस सलील शेट्टी यांनी भारतातील परिस्थितीवर केलेले भाष्य गंभीर आणि तितकेच चिंतनीय आहे. व्यवसायविस्ताराच्या मोहापायी जगाने चीन आणि भारतातील मानवी हक्कांच्या पायमल्लीकडे सातत्याने दुर्लक्ष केले. परंतु हे आर्थिक आकर्षण आता पूर्वीइतके राहिलेले नाही. हे वास्तव आहे. आणि ते महत्त्वाचे अशासाठी ठरते की त्यामुळे भारतातील असहिष्णू वर्तमानाची अधिकाधिक चिकित्सा आता जागतिक पातळीवर होऊ लागली असून भारतासाठी ते अडचणीचे ठरणारे आहे. या संदर्भात ते संयुक्त राष्ट्राच्या जिनिव्हा येथील परिषदेचा दाखला देतात. या परिषदेत भारताने मानवी हक्कांसंदर्भात चढय़ा सुरात आत्मस्तुतीचा प्रयत्न केला. परंतु तो अन्य देशांनी हाणून पाडला आणि येथील वाढत्या असहिष्णुतेकडे संबंधितांचे लक्ष वेधले. भारतातील वास्तवाची कठोर चिकित्सा व्हायला हवी, हा मतप्रवाह जगात सुदृढ होत असल्याचे त्यांचे मत म्हणूनच महत्त्वाचे. त्याची दखल सत्ताधारी घेतील, ही आशा. अॅम्नेस्टी इंटरनॅशनलचा २०१६चा वार्षिक अहवाल जग हे कसे बंदिशाळा होऊ घातले आहे, ते दाखवून देतो. या बंदिशाळेत भारताचाही समावेश होणे हे आपणास खचितच भूषणावह नाही, असे मत ‘जग हे ‘बंदी’शाळा..’ या अग्रलेखात मांडण्यात आले आहे. पुढच्या गुरुवापर्यंत विद्यार्थ्यांना आपले मत नोंदविता येईल. हे लेख ब्लॉग बेंचर्सच्या loksatta.com/blogbenchers या संकेतस्थळावर वाचता येतील. या स्पर्धेमध्ये प्रत्येक आठवडय़ाच्या शुक्रवारी जाहीर केल्या जाणाऱ्या लेखावर विद्यार्थ्यांना व्यक्त व्हायचे असते. विद्यार्थ्यांना मत नोंदविणे सोपे जावे यासाठी ‘लोकसत्ता’ने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील यांना बोलते केले. स्पर्धेत सहभागी होण्यात अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी loksatta.blogbenchers@expressindia.com या ई-मेलवर संपर्क साधावा.